वाई :कोयना खोऱ्यातील झाडाणी गाव पुनर्वसित आहे. गावात एकही वस्ती नाही. तरीही वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी आमदारपदाचा गैरवापर करून वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दबावाखाली झाडाणी येथे वीज ट्रान्सफर आणि वीजजोडणी करण्यास लावली. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील ५१ लाखांचा निधी वापरण्यात आला. त्यामुळे आमदार पाटील जननायक नसून लाभदायक आहेत, असा गंभीर आरोप युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी केला.सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई उपस्थित होते.

विराज शिंदे म्हणाले, झाडाणीतील लोक रायगड जिल्ह्यात पुनर्वसित झाले आहेत. या गावात मोठ्या अधिकाऱ्यांनी आणि राजकीय लोकांनी जमिनी घेतल्यात. चंद्रकांत वळवी या झाडाणी प्रकरणात जमीन खरेदीतही आमदार मकरंद पाटील यांचा हात असावा, अशी शंका येते. कारण, आर्थिक व्यवहार झाल्याशिवाय नियमबाह्य काम झालेले नाही. त्यामुळे आमदार पाटील यांची सीबीआय तसेच एसआयटी चौकशी करावी. त्यांच्यावर गुन्हा नोंद करून आमदारकीही रद्द करावी, अशी मागणी विराज शिंदे यांनी केली आहे.

हेही वाचा >>>मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप, “ओबीसी समाजाची बैठक ‘मॅनेज’ होती, भुजबळ मराठ्यांचं वाटोळं..”

अधिकाऱ्याचीही जमीन असल्याचे समजते. सालोशी येथील वळवी व सावे वस्ती येथे आदित्य चंद्रकांत वळवी यांनी ४० एकरांत अनधिकृतरीत्या रिसॉर्टचे बांधकाम करून अनेक झाडांची कत्तल केली. कोणतीही रॉयल्टी न भरता उत्खननही केले आहे. रिसॉर्टचे बेकायदा बांधकाम करताना वीजपुरवठा केला. यासाठी जिल्हा वार्षिक योजना आराखड्यातून निधी उपलब्ध होण्यासाठी वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी वीज कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना शिफारस पत्र दिले होते. त्यानुसारच हा वीजपुरवठा केला. तेथे वळवी वस्ती अस्तित्वात नाही. मात्र, आमदार पाटील यांनी पदाचा गैरवापर करून अधिकाऱ्यांवर दबाव आणला. त्यानंतरच रिसॉर्टला वीजपुरवठा उपलब्ध झाला.

वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी पदाचा गैरवापर केला आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्यासाठी पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. पाटील यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी आहे. अन्यथा उच्च न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल करणार आहे, असा इशाराही विराज शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत दिला आहे.