राज्यात अखेरच्या टप्प्यात मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील १३ मतदारसंघांमध्ये आज, सोमवारी मतदान होत आहे. गेल्या वेळी भाजप-शिवसेना युतीने या सर्व १३ जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेतील फुटीनंतर ठाणे, दक्षिण मुंबई मतदारसंघांच्या खासदारांनी ठाकरे गटाला साथ दिली. महायुतीला ११ तर शिवसेना ठाकरे गटापुढे दोन मतदारसंघ कायम राखण्याचे आव्हान असेल. मुंबई, ठाणे पट्ट्यातील १० मतदारसंघांमध्ये महायुतीची कसोटी आहे.

वायव्य मुंबई

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर या दोन शिवसैनिकांमध्ये चुरशीची लढत होत आहे. गैरव्यवहारांच्या आरोपांवरून दोन्ही उमेदवारांची ‘ईडी’कडून चौकशी झाली. गजाआड होण्यापासून वाचण्यासाठी आपण शिंदे गटात प्रवेश केला हे विधान वायकर यांच्या अंगाशी आले. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे या एकाच मुद्द्यावर भाजपची वायकर यांना साथ. मराठी, उत्तर भारतीय, मुस्लीम, गुजराती असे संमिश्र मतदार या मतदारसंघात आहेत. एकूण १७ लाख ३५ हजार मतदार आहेत.

ईशान्य मुंबई

मुलुंड ते शिवाजीनगर-मानखुर्द दरम्यान पसरलेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघात भाजपचे मिहिर कोटेचा आणि शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील या दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षांनी ही जागा प्रतिष्ठेची केल्याने आणि कोटेचा यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांचा रोड शो आयोजित करण्यात आल्याने ही जागा भाजपसाठी अनन्यसाधारण महत्त्वाची ठरली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तीन सभा या मतदारसंघात झाल्या. या मतदारसंघात १६ लाख ३६ हजार मतदार असून त्यामध्ये सर्वाधिक सात लाख ६० हजार मराठी, खालोखाल दोन लाख ४० हजार मतदार मुस्लीम, तर गुजराती, मारवाडी दोन लाख मतदार आहेत. हिंदी भाषिक मतदारांची संख्याही पावणे दोन लाखाच्या आसपास आहे. कोटेचा यांची सारी मदार गुजराती-मारवाडी आणि उत्तर भारतीयबहुल मुलुंड, घाटकोपरमधील मतदारांवर आहे, तर संजय पाटील यांना शिवाजी नगर-मानखुर्दमधील मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो यावर त्यांचे यशापयश अवलंबून आहे. धारावी प्रकल्पबाधितांचे मुलुुंडमधील पुनर्वसन हा मुद्दा प्रचारात चांगलाच गाजला. मराठी-गुजराती वादाचा प्रकारही घडला. मुंबईत केवळ याच मतदारसंघात दोन्ही बाजूच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी वा समोरासमोर येण्याचे प्रकार घडले आहेत.

उत्तर मध्य मुंबई

काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि भाजपचे अॅड. उज्ज्वल निकम यांच्यात लढत होत आहे. निकम यांच्या उमेदवारीने मुंबईवरील दहशतवादी हल्ला, कसाब, हेमंत करकरे यांचा मृत्यू हे सारे विषय प्रचाराच्या केंद्रस्थानी आले होते. विमानतळाच्या आसपासच्या झोपड्यांचा प्रश्न हा मतदारसंघातील महत्त्वाचा प्रश्न आहे. काँग्रेससाठी ही जागा प्रतिष्ठेची आहे. १७ लाखांपेक्षा अधिक मतदार या मतदारसंघात आहेत.

हेही वाचा >>>“…तर निवृत्ती घेतली असती”; फडणवीसांचं मोठं विधान; उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणाले, “जर वेळ आली”

दक्षिण मुंबई

शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सांवत आणि शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्यात लढत होत आहे. सावंत हे गेली दहा वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. यंदा भाजपची साथ त्यांना नाही. उच्चभ्रू आणि कनिष्ठ असे दोन्ही वर्गातील मतदार या मतदारसंघात आहेत. केंद्र सरकारच्या जमिनींवरील झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षे रखडलेला आहे. प्रचारात हा मुद्दा महत्त्वाचा ठरला. यामिनी जाधव यांच्या वादग्रस्त पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने त्यांना लक्ष्य केले होते. सुमारे १५ लाख ५० हजार मतदार आहेत.

दक्षिण मध्य मुंबई

शिवसेना शिंदे गटाचे विद्यामान खासदार राहुल शेवाळे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यात लढत होत आहे. धारावीचे पुर्नवसन हा प्रश्न या मतदारसंघातील प्रचाराच्या केंद्रस्थानी होती. याशिवाय झोपड्यांच्या पुनर्वसनाचा विषयही तापला होता. शिवसेनेची स्थापना झालेल्या दादर आणि पक्षाचे मुख्यालय शिवसेना भवन या मतदारसंघात असल्याने ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुंबईतील सहापैकी सर्वात कमी १४ लाख ७५ हजार मतदार या मतदारसंघात आहेत.

हेही वाचा >>>“…तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही”; देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा

उत्तर मुंबई

भाजपसाठी मुंबईतील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने स्थानिक नेते भूषण पाटील यांना उमेदवारी दिली असून त्यांनी कमी वेळ उपलब्ध होऊनही चांगला प्रचार केला आहे. स्थानिक विरुद्ध उपरा उमेदवार असा वाद निर्माण करण्यात आला असून हायप्रोफाईल नेता सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवू शकणार नाही, असा प्रचार झाला. झोपडपट्टी आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास, परिसरात अतिविशेषोपचार (सुपरस्पेशालिटी) रुग्णालयाचा अभाव, शिक्षण, आरोग्य, वाहतूक कोंडी, उपनगरी प्रवाशांच्या समस्या, कोकणवासीयांच्या अडचणी, असे विविध प्रश्न प्रचारात मांडण्यात आले. उत्तर मुंबईला ‘उत्तम मुंबई’ करण्याचे आश्वासन गोयल यांनी दिले आहे. एकूण १८ लाख मतदार आहेत.

दिंडोरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे<strong> यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात या मतदारसंघात ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यात लढत होत आहे. शिवसेनेत झालेल्या फुटीचा सर्वात मोठा परिणाम या मतदारसंघात पाहायला मिळतो. भाजपच्या स्थानिक नेत्यांची असलेली नाराजीमुळे हा मतदारसंघ सुरुवातीला चर्चेत आला. त्यामुळे श्रीकांत यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार उतरवून या नाराजीचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल असा अंदाज सुरुवातीला बांधला जात होता. मात्र दरेकर हे आव्हान कितपत पेलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात सुमारे २१ लाख मतदार आहेत.

पालघर

शहरी, ग्रामीणआदिवासी असा संमिश्र मतदारसंघ असलेल्या या मतदारसंघात भाजप, शिवसेना (उद्धव गट) आणि बहुजन विकास आघाडी अशी तिहेरी लढत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या भारती कामडी, बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील आणि भाजपचे डॉ. हेमंत सावरा अशी तिरंगी लढत होत आहे. डहाणू, तलासरी पट्ट्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची हक्काची मते आहेत. माकपने यंदा शिवसेना ठाकरे गटाला पाठिंबा दिला आहे. सुमारे २१ लाख मतदार आहेत.

ठाणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात या मतदारसंघात ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यात लढत होत आहे. शिवसेनेत झालेल्या फुटीचा सर्वात मोठा परिणाम या मतदारसंघात पाहायला मिळतो. भाजपच्या स्थानिक नेत्यांची असलेली नाराजीमुळे हा मतदारसंघ सुरुवातीला चर्चेत आला. त्यामुळे श्रीकांत यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार उतरवून या नाराजीचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल असा अंदाज सुरुवातीला बांधला जात होता. मात्र दरेकर हे आव्हान कितपत पेलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात सुमारे २१ लाख मतदार आहेत.

भिवंडी

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना या मतदारसंघात भाजपने सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. कुणबी, आगरी आणि मुस्लीम समाजाची मोठी मते असलेला हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने काँग्रेसकडून हिसकावून घेतला आहे. सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली असून शहापूर, भिवंडी ग्रामीण पट्ट्यात कार्यरत असलेले जिजाऊ संघटनेचे नीलेश सांबरे अपक्ष रिंगणात आहेत. जातीय ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न झाला आहे. या मतदारसंघात २१ लाख मतदार आहेत.

धुळे

महायुतीकडून भाजपचे सुभाष भामरे विरुद्ध महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या शोभा बच्छाव या दोन डॉक्टरांमधील प्रचार अगदी शेवटच्या दिवसापर्यंत रंगतदार ठरला. विशेष म्हणजे दोघांच्या उमेदवारीला प्रारंभी स्वपक्षांमधूनच विरोध झाला होता. भामरे १० वर्षे खासदार असताना एकही मोठा प्रकल्प मतदारसंघात आणता न येणे, धुळे शहराचा पाणीप्रश्न, कृषिमालाल भाव नसणे या विषयावर मविआकडून भर देण्यात आला. प्रत्युत्तरात भामरेंकडून विकास कामांपेक्षा मोदी मुद्यावरून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला. धुळे आणि मालेगाव शहरांमध्ये एमआयएम, समाजवादी पक्ष हे मविआच्या पाठीशी राहिल्याने मतांच्या ध्रुवीकरणासाठी भाजपकडून शेवटच्या दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मालेगावात सभा घेण्यात आली. नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या या लोकसभा मतदारसंघात भामरे हे धुळे जिल्ह्यातील तर, बच्छाव या नाशिक जिल्ह्यातील असल्याने प्रादेशिकतावादाची किनारही या लढतीस आहे. सुमारे २० लाख मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत.

नाशिक

महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे विरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे अशी मुख्य लढत आहे. अपक्ष शांतिगिरी महाराज यांची उमेदवारीही समर्थकांकडून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रांमुळे चर्चेत आली. महायुतीकडून उशिराने जाहीर झालेल्या उमेदवारीमुळे प्रारंभी प्रचारात गोडसे हे मागे असल्याचे चित्र अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चारवेळा केलेल्या नाशिक दौऱ्यामुळे काहीसे बदलले आहे. मित्रपक्षांचे अलिप्ततावादी धोरण, भुजबळ यांना उमेदवारी न मिळाल्याने ओबीसी समाजाची नाराजी ठळकपणे दिसून आली. गोडसे यांचा भाजपशी संबंधित शहरी मतदारांवर तर, वाजे यांचा ग्रामीण मतदारांवर अधिक भर राहिला. अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज हे गोडसे आणि वाजे या दोघांच्या मतांमध्ये वाटेकरी ठरण्याची चिन्हे आहेत.