लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटामुळे महायुतीला फटका बसला असल्याचं आरएसएसच्या मुखपत्रातील लेखात म्हटलं होतं. तेव्हापासून अजित पवारांना टार्गेट केलं जातंय, अशी चर्चा आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार वेगळा निर्णय घेतात की महायुतीतूनच लढतात हा प्रश्नचिन्ह अधोरेखित झाला आहे. यावर, आज चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे.

महाराष्ट्रातील पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी काल (मंगळवारी) दिल्लीत महाराष्ट्र भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अजित पवारांबाबत काय चर्चा झाली का? अजित पवार गट आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवणार की महायुतीतून असे प्रश्न विचारण्यात आले. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “महायुतीत सर्वांनाच एकत्र काम करायचं आहे. महायुती पुढे नेण्याकरता काम करायचं आहे.” असं बोलून चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांच्या भूमिकेबाबत स्पष्ट वक्तव्य करणं टाळलं आहे.

हेही वाचा >> दिल्लीतल्या बैठकीत निर्णय, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी कायम राहणार!

अजित पवारांना टार्गेट केलं जातंय, असं म्हटलं जातंय. त्यामुळे अजित पवारांना टार्गेट केलं गेलं तर विधानसभा निवडणुकीत वेगळा विचार केला जाईल असाही इशारा देण्यात आलाय. यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अजित पवारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आमच्याकडून तरी झालेला नाही.

छगन भुजबळ नाराज?

छगन भुजबळांच्या नाराजीवर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, त्यांची नाराज का आहे? त्यांची भूमिका काय हे समजल्याशिवाय मी माझं मत व्यकत करू शकत नाही.

फडणवीसांनी सरकारमध्ये राहूनच संघटनेला मदत करावी

फडणवीस यांनी सरकारमध्ये राहूनच संघटनेला मदत करावी अशी विनंती केली आहे. त्यांनी ती विनंती मान्य केली आहे असं आम्ही समजतो. केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा आमची विनंती मान्य केली असे आम्ही समजतो. महायुती सरकार लोकांच्यासाठी काम करेल, यासाठी त्यांनी सरकारमध्ये असणे आवश्यक आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

दरम्यान, एकनाथ खडसे भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यांचा भाजपात अद्याप पक्षप्रवेश झालेला नाही. त्यामुळे भाजपात आल्यावर त्यांना कोणती संधी दिली जाणार? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बावनकुळे म्हणाले, “एकनाथ खडसे अद्याप भाजपात आलेले नाहीत. ते भाजपात येतील तेव्हा पाहू. आमचे प्रभारी अश्विनी वैष्णव याबाबत निर्णय घेतील.”

नाना पटोलेंनी इंग्रजांचा काळ आणला

“नाना पटोले इतक्या खालच्या लेव्हलला गेले आहे. शेतकऱ्यांकडून पाय धुवायला लावत आहेत. या महाराष्ट्रात अशोभनीय प्रकार नाना पटोले यांनी केला. इंग्रजांचा काळ काँग्रेसने आणला आहे. त्या काळातील मानसिकता नाना पटोलेंमध्ये उतरली आहे. नाना पटोले यांनी पदाचा अपमान केलेला आहे. त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे”, अशीही टीका बावनकुळेंनी केली.