पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीत ताळमेळ दिसत नाही त्यावर काय सांगाल असं विचारलं असता महाविकास आघाडीत ताळमेळ नाही हे आम्ही अडीच वर्षांपासून सांगत होतो त्यात नवीन काय? त्यामुळेच तर हे सरकार बदलावं लागलं असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. सरकार म्हणून आम्ही जे काम करतो आहोत त्यामुळे अनेकांच्या पायाखालची जमीन सरकरली आहे. छातीत धडकी भरली आहे त्यामुळे आरोपांवर आरोप केले जात आहेत असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसंच मुंबईचा आम्ही विकास करतो आहोत त्यामुळे काहीजणांचं नुकसान होणार असं दिसतंय म्हणून आमच्यावर आरोप होत आहेत असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईकरांचा पैसा खड्ड्यात चालला होता तो आम्ही वाचवत आहोत मुंबईकरांना जे आवश्यक आहे ते देण्याचं काम आम्ही करतो आहोत असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. गेली २५ वर्षे खड्ड्यांमुळे मुंबईकरांना यातना भोगाव्या लागल्या आहेत. प्रसारमाध्यमांनीही खड्डे दाखवले, त्यात बळी गेलेल्यांच्या बातम्याही दाखवल्या. खड्डे दुरूस्तीसाठी जे कोट्यवधी रूपये टाकले जातात ते वाया जाणारे पैसे आहेत. त्यामुळे आम्ही काँक्रिटचे रस्ते आम्ही तयार करतो आहोत. पुढचे २५ ते ३० वर्षे हे रस्ते आम्ही तयार करत आहोत. शास्त्रीय दृष्ट्या उत्तम रस्ते तयार केले जात आहेत. आम्ही जे काम करतो आहोत त्यामुळे कुणाला तरी नुकसान होत असेल तर मी त्यावर बोलू इच्छित नाही असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईचा चेहरामोहरा बदलायचा असेल, कोळीवाडा आम्ही सुधरवत असू तर ते करायला आधी कुणी थांबवलं होतं का? उलट आम्ही जे काम करतो आहोत त्याला सहकार्य केलं पाहिजे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. बीकेसीमधल्या तयारीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा मुंबईत होतो आहे. मुंबईतली जी विविध विकासकामं आहेत त्यांचं भूमिपूजन आहे. काँक्रिटचे रस्ते, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, तीन रूग्णालयांचं भूमिपूजन, मुंबईतली 2A आणि 7A चं लोकार्पण केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे कार्यक्रम पार पडणार आहेत. आम्ही सगळ्या कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी करतो आहोत. मुंबईकर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कधीही काम करत नाही निवडणुका डोळ्या समोर ठेवून आम्ही कधीही काम करत नाही, यापुढे करणार नाही. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा यांचं सरकार आल्यानंतर विकासकामांना गती मिळाली आहे. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही विकासकामांना चालना दिली आहे. अनेक वर्षे मुंबईकरांनी खड्ड्यांतून प्रवास केला आहे. त्यामुळे खड्डेमुक्त मुंबईचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्याचंही भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होतं आहे. बीकेसीमध्ये जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. दावोसमध्ये आपण गेलो असताना त्या संपूर्ण कार्यक्रमावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छाप कशी दिसली हेदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.