४ जूननंतर काँग्रेसमध्ये विलिन होण्यापेक्षा एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटात सामील व्हा, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना उद्देशून केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर नरेंद्र मोदींनी शरद पवारांना ऑफर दिल्याची चर्चा झाली. परंतु, ही ऑफर नसून हा सल्ला आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना ऑफर दिली नाही. हा सल्ला आहे. मोदी म्हणाले बारामतीच्या निवडणुकीनंतर पवारांच्या लक्षात आलं की बारामतीची सीट अजित पवारांकडे चाललीय. तेव्हा शरद पवारांनी सांगितलं की ४ जूननंतर क्षेत्रीय पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होतील. त्यामुळे निवडणुकीचा निकाल पवारांना समजतोय. त्यापुढे नरेंद्र मोदी असं म्हणाले की काँग्रेस हे बुडतं जहाज आहे. काँग्रेसमध्ये जाऊनही तुम्ही वाचू शकणार नाही. त्यापेक्षा शरद पवारांनी अजित पवारांनी आणि उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात यावं, तर तुमचे राजकीय मनसुबे पूर्ण होतील. याचा अर्थ ऑफ होत नाही. याचा अर्थ सल्ला होतो. त्यांना सल्ला दिलाय”, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी केलं.

“आधीच तुम्ही बुडाले आहात आणि आता तुम्ही बुडत्या जहाजात जात आहात. पवारांनी पाच वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवल्याचं सांगितलं. पवारांची राजकीय कारकिर्द पाहिली तर ज्यावेळी त्यांचा पक्ष कमजोर झाला, त्यावेळी ते काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी आपली पोझिशन नीट केली आणि मग काँग्रेसमधून बाहेर पडले. १९७७ पासून ते आजपर्यंत आपण पाहिलं असेल जेव्हा त्यांचा पक्ष कमजोर होतो तेव्हा ते काँग्रेसमध्ये विलिन होतात, मग ते बाहेर पडतात. त्यामुळे त्यांनी असं स्टेटमेंट देणं याचा अर्थ हा ज्यांना इतिहास माहितेय त्यांना समजतोय, तो संदर्भ मोदींचा होता. ही ऑफर नाही”, असंही ते पुढे म्हणाले.

हेही वाचा >> पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांना एनडीएत येण्याचा प्रस्ताव; उद्धव ठाकरेंची खोचक टीका; म्हणाले…

नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, नंदूरबारमध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांना एनडीएत येण्याचा प्रस्ताव दिला. “छोटे छोटे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे, असे शरद पवार यांनी विधान केले होते. त्यांच्या विधानाचा अर्थ असा आहे की, नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे मन तयार केले आहे. मात्र, मी त्यांना सांगतो ४ जूननंतर काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा आमच्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर या. सर्व स्पप्न पूर्ण होतील”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं.

शरद पवारांनीही दिलं होतं स्पष्टीकरण

“आज देशामध्ये संसदीय आणि लोकशाही पद्धत मोदींमुळे संकटात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करून तुरुंगात टाकण्याची भूमिका घेतली गेली. केंद्र सरकारचा यात सहभाग असल्याशिवाय एवढी मोठी कारवाई होऊ शकत नाही. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, लोकशाही पद्धतीवर त्यांचा विश्वासच नाही. हा समज आता लोकांमध्येही पक्का झाला आहे. अशा लोकांबरोबर जाण्याचा निर्णय माझ्याकडून कधीही होणार नाही”, असे ते म्हणाले.

Story img Loader