राज्यात निरक्षर व आदिवासी भागात अपूर्ण सुविधा मिळत असल्यामुळे आणि मुलींच्या जन्मानंतर पालकांचे दुर्लक्ष होत असल्याने सधन भागातही स्त्रीभ्रूण हत्या वाढत असल्याबद्दल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी चिंता व्यक्त केली. मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळ आयोजित बहिणाबाई महोत्सवाचे उद्घाटन मुंडे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
आपण आमदार असतानाच आमच्या स्वयंसेवी संस्थेने जलयुक्त शिवार योजनेचे काम सुरू केले होते. तेच आमचे काम सरकारी योजना बनून समोर आले आहे. शासकीय योजना प्रत्येक माणसाची बनली तर ती यशस्वी होते. त्यामुळे आता दुष्काळ निर्मूलनाच्या कायमस्वरूपी उपायांवर काम करण्याची गरज आहे. हा दुष्काळ जसा निसर्गाचा असमतोल झाल्याने त्रासदायक ठरतो, तसा जळगाव जिल्ह्य़ातील दर हजारी मुलांच्या मागे मुलीची संख्या केवळ ८०० असलेला सामाजिक समतोल दूर करावा लागणार नाही का, असा प्रश्न करत मुंडे यांनी त्यामुळे महिला बालकल्याण विकास खाते या मुद्दय़ावर येत्या काळात काम करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, प्रदर्शनात विविध स्टॉल, मनोरंजनात्मक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. २२ ते २५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित कार्यक्रमात विविध महिला बचत गटाच्या वस्तू पदार्थ, कला आदींचे भव्य प्रदर्शन व विक्री, महाविद्यालयात सवरेत्कृष्ट ठरलेल्या नृत्य, गायन, संस्कृती, लोककलावंतांचा खान्देश जलसा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रवेश विनामूल्य महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महोत्सव समितीच्या अध्यक्षा खा. रक्षा खडसे यांनी केले आहे.