सांगली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केल्यानंतर सहा महिन्यांत पुणे-बंगळूरु हरित राष्ट्रीय महामार्ग निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हा मार्ग सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यातून जाणार असून यामुळे पुणे- बंगळूरु या दोन शहरातील अंतर ७५ किलोमीटरने कमी होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सांगलीमध्ये नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या सांगली जिल्ह्यातील मार्गाचे लोकार्पण मार्चमध्ये केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी त्यांनी पुणे-बंगळूर या हरित राष्ट्रीय महामार्गाची घोषणा केली होती. या घोषणेनंतर या महामार्गाचे आरेखन करण्याचे कामही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने पूर्ण करून भूसंपादनासाठी पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

नवीन राष्ट्रीय महामार्गातील ७३ किलोमीटरचा मार्ग जिल्ह्यातील खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ व मिरज तालुक्यातून जाणार आहे. खानापूर तालुक्यातील १२, तासगाव तालुक्यातील १४, कवठेमहांकाळ तालुक्यातील ९ आणि मिरज तालुक्यातील तीन गावांतील भूसंपादनासाठी दोन प्रांताधिकारी यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. या महामार्गासाठी ३१ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Work of greenfield expressway between pune and bengaluru started zws