चित्रपटसृष्टी म्हणजे अनिश्चिततेचं एक न उमगणारं समीकरण असं अनेकजण म्हणतात ते खरंच आहे. इथे कधी कोणता चित्रपट, कोणता कलाकार प्रसिद्ध होईल आणि त्यामागची काय कारणं असतील याचा काहीच नेम नसतो. पण, या सर्व परिस्थितीला समजून घेत त्या अनुषंगानेच काही कलाकार मंडळी या कलाविश्वात निर्धास्तपणे वावरत असतात. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता आमिर खान. प्रत्येक गोष्टीमधील बारकावे आणि खाचखळगे जाणत पुढची चाल करणारा आमिर ‘परफेक्शनिस्ट’ या नावानेही ओळखला जातो. चित्रपटाची निवड करण्यापासून ते अगदी त्याच्या नफ्यामध्ये असणाऱ्या भागीदारीत सर्व गोष्टींमध्ये त्याचा हा परफेक्टपणा दिसून येतो. हे गणित त्याने स्वत:च समजावून सांगितलं आहे.

आमिरचा नफा कमावण्याचा वेगळाच फंडा असून त्याबद्दल तो सांगतो की, ‘चित्रपटाचं कथानक हा त्याचा पाया असतो. मला जर एखाद्या चित्रपटाची कथा आवडली तर त्यात गुंतवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा पैसा वाया जाऊ नये याची मी फार काळजी घेतो. समजा, एखाद्या चित्रपट निर्मितीचा पूर्ण खर्च १०० कोटी रुपये इतका आहे. तर त्यापैकी मी सुरुवातीला एक रुपयाही स्विकारत नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर जेव्हा कमाई होऊ लागते तेव्हा आधी त्याचा पैसा प्रसिद्धी आणि जाहिरातींसाठी जातो. हा खर्च सुमारे २५ कोटी रुपयांचा असेल असं समजुया. प्रसिद्धी आणि जाहिरातींसाठीचा पैसा मिळाल्यावर निर्मात्यांकडे इतर रक्कम जाते. या सर्वांनंतर मी माझं मानधन घेतो. अशा पद्धतीमुळे निर्मात्याचा काहीच तोटा होत नाही. जर चित्रपट बॉक्स ऑफीसवर अपयशी ठरला तर मी एकही पैसा घेणार नाही. चित्रपटाचा सर्व खर्च कमाईच्या माध्यमातून वसूल झाल्यावरच मी माझं मानधन घेतो. नफा कमावण्याचा माझा हाच फंडा आहे आणि यामुळे निर्मातेसुद्धा खूश राहतात.’
‘जर माझ्या चित्रपटाने कमी कमाई केली, तर माझ्या वाट्याला कमी पैसे येणार आणि जर माझ्या चित्रपटाने जास्त कमाई केली, तर माझ्या वाट्याला जास्त पैसे येणार’, हे असं अगदी सोपं गणित त्याने समजावून सांगितलं.

मुख्य म्हणजे आमिर चित्रपट निर्मिती क्षेत्रातही सक्रिय असल्यामुळे एक अभिनेता म्हणून तो मानधन आकारत नसला तरीही निर्माता म्हणून मात्र चित्रपटाच्या नफा आणि तोट्यात त्याचाहा भाग असतो हे तितकंच खरं. त्यामुळे निर्मिती खर्च, निर्मिती संस्था आणि चित्रपटाच्या नफा, तोट्याची गणित आमिरने खऱ्या अर्थाने समजून घेतली आहेत असं म्हणायला हरकत नाही.