ऐतिहासिक कथानक असलेल्या चित्रपटांचा सध्या जोरदार ट्रेण्ड आहे. याचाच विचार करत बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान ‘महाभारत’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना ‘लार्जन दॅन लाइफ’ अनुभव देण्याचा आमिरचा प्रयत्न आहे आणि या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टसाठी तो सध्या दिवसरात्र मेहनत घेत आहे. अर्थातच या चित्रपटाचा खर्चदेखील तितकाच जास्त असणार आहे. मुकेश अंबानी या चित्रपटाचा खर्च उचलणार असल्याचे म्हटले जात आहे.

सीरिजमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याचे तीन ते चार भाग असल्याचे म्हटले जात आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक भागासाठी दिग्दर्शकसुद्धा वेगवेगळे असतील. ‘महाभारता’ची निर्मिती करणे हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे, असे आमिरने याआधी एका मुलाखतीत सांगितले होते.

वाचा : सीडीआर प्रकरणात टायगर श्रॉफच्या आईसह कंगनाचेही नाव

‘बाहुबली’ सीरिजचे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफीसवर खूप गाजले होते. असाच अद्वितीय चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा आमिरचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्याच्या या ड्रीम प्रोजेक्टची उत्सुकता प्रेक्षकांनाही लागून राहिली आहे. यामध्ये कोणाच्या भूमिका असणार, हे येत्या काळात स्पष्ट होणार असून आमिरच्या घोषणेकडेच अनेकांचे लक्ष आहे.

सध्या आमिर त्याच्या आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यामध्ये फातिमा सना शेख, अमिताभ बच्चन आणि कतरिना कैफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.