काही दिवसांपूर्वी बॉलिवूडच्या सुपरस्टार आमिर खानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून देशात चाललेल्या समस्यांवर भाष्य केले होते. आसाम आणि गुजरातमधील पूरजन्य स्थितीवर त्याने आपली काळजी व्यक्त करत नागरिकांना जास्तीत जास्त मदत करण्याचे आवाहन केलेले. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एएसडीएमए) दिलेल्या माहितीनुसार, अजूनही लखीमपुर आणि जोरहाट जिल्ह्यांमध्ये ५००० हून अधिक लोक पुरात अडकले आहेत. तर दोन जिल्यांमध्ये बांधण्यात आलेल्या चार राहत निवारा शिबिरांत ३६६ हून अधिक लोकं राहत आहेत.

या परिस्थितीबद्दल बोलताना आमिर म्हणाला की, ‘आसाम आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आपले बांधव तिकडे अडकले आहेत. या पुरात अनेक मृत्यूमुखीही पडले. एकीकडे जीवितहानी होत असताना वित्तहानीलाही आपल्याला सामोरे जावे लागत आहे. निसर्गासमोर तर आपण काहीही करू शकत नाही. पण तिथे राहणाऱ्यांना आपण मदत मात्र नक्कीच करु शकतो. मी त्यांना मदत करणारच आहे, तुम्हीही करा,’ असा संदेश आमिरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला.

दिलेला शब्द पाळण्यासाठी आमिर खान ओळखला जातो. आमिरने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आसाम सरकारला २५ लाख रुपये दिले. आसाममध्ये निसर्गाच्या या माऱ्यामुळे आतापर्यंत ९० जणांनी आपले प्राण गमावले असून अनेकांच्या डोक्यावरचे छप्पर उडाले आहे.
आसामचे मुख्यमंत्री सरबनंदा सोनोवाल यांनी ट्विट करून आमिरचे आभार मानले. सोनोवाल यांनी लिहिले की, ‘आमिर खान प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड’च्या वतीने आसामच्या जनतेसाठी केलेल्या मदतीसाठी आमिर तुझे खूप आभार.’