कंगना रणौतच्या एका टिव्ही मुलाखतीमुळे आदित्यच्या खासगी आयुष्यात वादळच आले होते. ‘इंडिया टीव्ही’ला दिलेल्या या मुलाखतीत कंगनाने आदित्यवर तिला घरात डांबून ठेवल्याचा आरोप केला होता. आदित्यने या प्रकरणात काही दिवस मौन बाळगले. त्यानंतर त्याने कंगनावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला. पण हे प्रकरण आता शांत होते न होते तोच अजून एक नवे संकट आदित्यसमोर उभे ठाकले आहे. आदित्यला खंडणीसाठी धमकी देणारे फोन येऊ लागले आहेत . आदित्यकडे तब्बल २५ लाखांची खंडणी मागितली जात आहे.

आदित्यने रविवारी संध्याकाळी वर्सोवा पोलीस ठाण्यात यासंदर्भात रितसर तक्रार नोंदवली. त्याने तक्रारीत सांगितले की, त्याच्या खाजगी फोन नंबरवर २५ लाख रुपयांची खंडणी मागणारे फोन येत आहेत. जर २५ लाख रुपये दिले नाहीत तर त्याचे विपरित परिणामही भोगावे लागतील, अशी धमकी त्याला देण्यात आली आहे. त्याला फोन करणारी व्यक्ती स्वतःचे नाव मुन्ना पंजाबी असल्याचे सांगितले. ‘स्पॉटबॉय’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत आदित्य म्हणाला की, सध्या तो या प्रकरणामुळे खूप चिंतेत असून यावर अधिक काही बोलू इच्छित नाही.

दरम्यान, कंगना अनेक वर्षांपासून त्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आदित्यचे म्हणणे आहे. ‘कंगनाने माझ्यासोबतच माझी पत्नी, मुलगी आणि मुलगा यांनाही या प्रकरणात ओढण्याचा प्रयत्न केला. मी सध्या माझ्या कुटुंबाला घेऊन चिंतेत आहे. मी महिलांना मारणे आणि त्यांना त्रास देण्याचे आरोप सहन करु शकत नाही,’ असे आदित्य म्हणाला.