गेल्या आठवड्यात कोलकात्यात झालेल्या एका कार अपघातात अमिताभ बच्चन थोडक्यात बचावले. २३ व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनाला बिग बी यांनी उपस्थिती लावली होती. शनिवारी सकाळी मुंबईला परतत असताना विमानतळावर जाताना ही घटना घडली. त्यांच्या मर्सिडीज गाडीचे मागचे चाक अचानक निखळले. सुदैवाने या अपघातात त्यांना कोणतीही इजा झाली नाही. या प्रकरणात राज्य सरकारने कार उपलब्ध करून देणाऱ्या ट्रॅव्हल एजन्सीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सचिवालयाच्या एका अधिकाऱ्याने घटना घडल्याला दुजोरा देत म्हटले की, 'शनिवारी सकाळी बच्चन मुंबईला जाण्यासाठी विमानतळावर जात होते. तेव्हा डुफ्फेरिन रोडवर त्यांच्या मर्सिडीज गाडीचे मागचे चाक अचानक निखळले. चाक निखळल्यामुळे कारचे नियंत्रण सुटले पण कुठला अनुचित प्रकार घडला नाही. तपासणीत कारचे आयुर्मान संपले असतानाही ती चालवण्यात येत होती. त्यामुळे ज्या ट्रॅव्हल एजन्सीने कार उपलब्ध करुन दिली होती त्या एजन्सीला आता नोटीस पाठवण्यात आली आहे.' अमिताभ यांच्यासोबत त्या गाडीत वरिष्ठ राज्यमंत्रीही होते. या अपघातानंतर मंत्र्याच्या वाहनातून ते विमानतळावर पोहोचले, असे कोलकाता वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, महानायक अमिताभ बच्चन यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आजवर मोलाचे योगदान दिले आहे. या योगदानानाबद्दल 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया' म्हणजेच 'इफ्फी'द्वारे त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती व सूचना मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार यंदाच्या 'इफ्फी'त बच्चन यांना 'पर्सनॅलिटी ऑफ द इयर' या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. फक्त चित्रपटसृष्टीतच नव्हे तर, सरकारच्या विविध उपक्रमांमध्येही त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला होता. 'स्वच्छ भारत' अभियानासह विविध उपक्रमांसाठी बिग बींची ब्रॅण्ड अॅम्बेसिडरपदी निवडही करण्यात आली होती. त्यामुळे सामाजिक जनजागृती करण्यासाठीसुद्धा त्यांनी हातभार लावला असल्यामुळेच त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना या सन्मानाने गौरवण्यात येणार आहे.