बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांचा कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही तितकाच वावर आहे. ट्विटरवर ते सर्वाधिक सक्रिय असतात. ट्विटरच्या माध्यमातून ते विविध घडामोडींवर त्यांचं मत व्यक्त करत असतात. तर कधी कधी सोशल मीडियावर त्यांना आवडलेल्या गोष्टीसुद्धा ते शेअर करतात. बिग बींनी ट्विटरवर नुकतीच एक मराठी पोस्ट लिहिली असून यातून त्यांनी अनेकांची स्वप्न कोणत्या कारणामुळे अपूर्ण राहतात हे सांगितलं आहे. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी सर्वसामान्य माणूस लोक काय म्हणतील हा विचार करतो. या विचारामुळे अनेकांनी पाहिलेली त्यांची स्वप्न अपूर्ण राहतात. त्यामुळेच याविषयी बिग बींनी ट्विट करत स्वप्नपूर्तीमध्ये नेमका कोणत्या गोष्टीचा अडथळा येतो हे सांगितलं. T 3298 - खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे .“लोक काय म्हणतील?” Many people's dreams remain unfulfilled with this one thought, "What will people say?" — Amitabh Bachchan (@SrBachchan) September 24, 2019 ''खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे .“लोक काय म्हणतील?”, असं ट्विट बिग बींनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटमुळे अनेकांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं असून त्यांनी मराठीमध्ये ट्विट का केलं असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. दरम्यान, बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणारे बिग बी लवकरच मिलिंद लेले दिग्दर्शित ‘ए बी आणि सी डी ‘ या मराठी चित्रपटात झळकणार आहेत. त्यामुळेच त्यांनी हे ट्विट मराठीमध्ये केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.