अर्जुन कपूर जेव्हा ११ वर्षांचा होता तेव्हा बोनी कपूर यांनी श्रीदेवीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. नुकतेच अर्जुनने आपल्या आयुष्याशी निगडीत काही महत्त्वपूर्ण गोष्टी शेअर केल्या. त्याने सावत्र आणि बहिणींशी असलेल्या नात्याबद्दलही खुलेपणाने सांगितले. त्याचबरोबर वडिलांबरोबर असणाऱ्या नात्याबद्दलही भाष्य केले.

काही दिवसांपूर्वी कपूर कुटुंबामध्ये एक लग्न होते. या लग्नाला अर्जुन बहिण सोनमसोबतच जास्त दिसण्यात आला. या लग्नाला त्याच्या दोन सावत्र बहिणी जान्हवी आणि खुशीही होत्या. पण त्यांच्याशी अर्जुनचा काहीच संवाद झाला नाही. ‘हफिंगटनपोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत अर्जुनने सावत्र बहिणींसोबत असलेल्या नात्याचा खुलासा केला.

अर्जुन म्हणाला की, ‘मी जान्हवी आणि खूशीला कधी भेटत नाही आणि त्यांच्यासोबत वेळही घालवत नाही. त्यांचं माझ्या आयुष्यात काहीही स्थान नाही.’ जेव्हा अर्जुनचे आई- वडील वेगळे झाले होते तेव्हा अर्जुन फक्त ११ वर्षांचा होता. त्यांच्या घटस्फोटाचा गंभीर परिणाम अर्जुनच्या आयुष्यावर पडला होता. म्हणूनच त्याने कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. पण ३२ व्या वर्षी त्याचे मतपरिवर्तन झाले. ‘आता मला कळतंय. जेव्हा तुम्ही थकून घरी पोहोचता तेव्हा तुम्हाला जोडीदाराची गरज वाटते.’

आपल्या रिलेशनशिपबद्दल बोलताना अर्जुन म्हणाला की, ‘जी माझ्या आयुष्यात येईल ती नेहमीच माझ्यासोबत असेल. जेव्हा नाती खराब होतात तेव्हा त्याला वेळ देणं गरजेचं असतं. मी माझ्या साथीदाराला समझून घेईन आणि तिलाही मला समझून घेण्याची संधी देईन.’

अर्जुनच्या आईचा कर्करोगाने मृत्यू झाला होता. याबद्दल बोलताना अर्जुन म्हणाला की, ‘मी आई बाबांशिवाय पाच वर्ष घालवली आहेत. मी आजही जेव्हा घरी जातो तेव्हा आईच्या खोलीत जातो. तिथे जाऊन आईशी गप्पा मारतो. तिथे मला शांत वाटतं. माझ्या आईला वाटतं होतं ते मी सगळं मिळवेन.’