उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे सामुहिक बलात्कार पीडित १९ वर्षीय दलित तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर संतापाचं वातावरण पसरलं असून अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे. यामध्येच अभिनेता अर्जुन रामपाल यानेदेखील या घटनेचा निषेध करत सोशल मीडियावर मत व्यक्त केलं आहे.
“एका १९ वर्षीय जीवाचा वेदनांमुळे अंत होतो, तिचं निधन होतं. तिच्या शेवटच्या आठवणी या भीती आणि कटू होत्या. या घटनेनंतर कसं काय शांत झोप लागू शकते”, असं ट्विट अर्जुन रामपाल याने केलं आहे.
दरम्यान, हाथरस येथील सामुहिक बलात्कार प्रकरणी सध्या सर्व स्तरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अर्जुनप्रमाणेच अक्षय कुमार, स्वरा भास्कर, कंगना रणौत, मीरा चोप्रा, रिचा चड्ढा आणि रितेश देशमुख यासारख्या कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
दिल्लीतील निर्भया प्रकरणाप्रमाणेच उत्तर प्रदेश येथील हाथरस येथे सामुहिक बलात्काराची घटना घडली. चार तरुणांनी एका तरूणीवर बलात्कार करुन, तिची जीभ कापली आणि तिची मान मोडल्याचा अत्यंत संतापजनक व अमानुष प्रकार घडला. यामुळे अत्यंत गंभीर स्थितीत असलेल्या या तरुणीची दोन आठवड्यांपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर २९ सप्टेंबर रोजी तिची प्राणज्योत मालवली.