करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसला असून लसींसोबतच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अशा अनेक सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. सर्वजण राजकारणी आणि सरकारवर टीका करताना दिसतायेत. दरम्यान मराठमोळा अभिनेता आस्ताद काळेने देखील सरकार आणि राजकारण्यांवार निशाणा साधला आहे. त्याने केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.

आस्तादने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार, राज्य सरकार, राजकारणी यांना सवाल केला आहे. ‘प्रश्न विचारायचे आहेत. स्वत्व जपायचं आहे. कदाचित जीव गमवावा लागू शकतो. कारण.. श्शु!!! कुठे काही बोलायचं नाही. अरे हाड. आम्ही प्रश्न विचारणार. सत्तेच्या आणि सत्तेतल्या प्रत्येकाला. उत्तरं न देता आम्हाला गप्प करू बघाल तर तुम्ही किती नागडे आहात तेच दिसणार. नागडे राजकारणी…नागडं सरकार…नागडा देश. निरोप घेतो’ असे म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘लोकं उपाशी मरतायेत आणि…’, काजोलचा व्हिडीओ पाहून संतापले यूजर्स

आस्तादची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने ‘हे बरोबर आहे’ असे म्हटले आहे. अशा अनेक कमेंट पोस्टवर पाहायला मिळतात.

‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत आस्ताद काम करताना दिसत होता. पण काही दिवसांपूर्वीच कलर्स मराठी वाहिनीवरील या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. लवकरच तो एका वेब सीरिजमध्ये देखील दिसणार आहे.