‘बिग बॉस’चा शो आणि वादविवाद हे समीकरण तर ठरलेलंच आहे. सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचा अकरावा सिझन नुकताच सुरू झाला. या शोच्या प्रसिद्धीचं सर्वांत मोठं कारण म्हणजे स्पर्धकांमध्ये होणारे वादविवाद. या सिझनच्या पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात कडाक्याचं भांडण पाहायला मिळालं. टेलिव्हिजन अभिनेत्री शिल्पा शिंदे आणि निर्माता-लेखक विकास गुप्ता या दोघांमध्ये बाचाबाची झाली.

विकास आणि शिल्पामध्ये बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वीच वाद होता. ‘भाभीजी घरपे है’ ही मालिका सोडण्यामागे तिने विकासलाच जबाबदार ठरवलं होतं. त्यामुळे या दोघांमध्ये खटके उडणं साहजिकच होतं. पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात विकास हितेनशी गप्पा मारत होता. मालिकेदरम्यान त्याला शिल्पाचा कशाप्रकारे त्रास सहन करावा लागला हे तो हितेनला सांगत होता. ‘तीन महिन्यांतच तिने मानधन वाढवण्यास सांगितलं. तिला दुसरा शो मिळत होता म्हणून तिने दुप्पट मानधन मागितलं. म्हणूनच तिला मालिकेतून काढण्याचा निर्णय घ्यावा लागला. ती गेल्यानंतरही मालिकेचा टीआरपी चांगला आहे. मला जर माहित असतं ती बिग बॉसच्या घरात येणार आहे तर मी इथं कधीच आलो नसतो,’ अशा शब्दांत विकासने सुनावलं. हे ऐकल्यावर शिल्पाचाही राग अनावर झाला. तिनेही विकासला चार शब्द सुनावले आणि तिला रडू कोसळले. त्यानंतर बिग बॉसच्या घरातील अन्य स्पर्धकांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला.

वाचा : दिव्यांका त्रिपाठीने ट्विटरवरून व्यक्त केला संताप

‘भाभीजी घरपे है’ या मालिकेत शिल्पाने साकारलेली अंगुरी भाभाची भूमिका प्रचंड गाजली. मात्र निर्मात्यांसोबत झालेल्या वादामुळे तिने मालिकेतून काढता पाय घेतला होता. पहिल्याच दिवशी ‘बिग बॉस’च्या घरात हा वाद पुन्हा एकदा समोर आल्याने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं गेलं.