‘बिग बॉस’च्या घरी सलमानने ‘विकेंड का वार’मध्ये स्वतःसोबत अजून तीन पाहुणेही आणले होते. वृत्त निवेदिका श्वेता सिंह, अभिनेत्री तनीषा मुखर्जी आणि अभिनेता करणवीर वोहरा या तिघांनी ‘बिग बॉस’च्या अधीच्या पर्वात घरात प्रवेश घेतला होता. घरातील सदस्यांना आपल्या आयुष्याशी निगडीत एक सत्य सांगायचे होते जे आतापर्यंत कोणालाही सांगितले नव्हते. यावेळी सर्वच सदस्यांनी त्यांच्या आयुष्याशी निगडीत एक असे सत्य सांगितले जे आतापर्यंत कोणालाच माहित नव्हते.

घरी आलेल्या तीन पाहुण्यांना सलमानने सदस्यांनी सांगितलेल्या गुपितापैकी कोणाचे गुपित अधिक भावले हे निवडायला सांगितले. यावेळी श्वेता, तनीषा आणि करणवीर या तिघांनीही शिल्पा शिंदेचे नाव घेतले. शिल्पाने यावेळी सांगितले की, ‘तिने अजूनपर्यंत पदवीचे शिक्षण पूर्ण केले नाही हे तिच्या वडिलांना माहित नाही.’

‘माझे बाबा आता या जगात नाहीत. मला या गोष्टीचे फार वाईट वाटते की मी ही गोष्ट त्यांना शेवटपर्यंत सांगू शकले नाही. असे नाही की मी त्यांना ही गोष्ट सांगायचा प्रयत्न केला नाही. पण शेवटपर्यंत ते शक्य झालं नाही. शिल्पाच्या या गुपितामुळे श्वेता, तनीषा आणि करणवीर तीघंही भावूक झाले होते. पदवीधर न झाल्याचे बाबांपासून लपवणे फार कठीण काम होते. आता हीच गोष्ट मला सर्वात जास्त दुःख देतेय.’

‘बिग बॉस’च्या घरात अगदी पहिल्या दिवसापासूनच शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता या दोघांमध्ये बरेच खटके उडाल्याचे पाहायला मिळाले. इतकच नव्हे तर, शिल्पाचे टोमणे ऐकून त्रासलेल्या विकासने ‘बिग बॉस’च्या घरातून पळण्याचाही प्रयत्न केला होता. शिल्पा आणि विकासमध्ये आरोप प्रत्यारोपांचं सुरु असणारं हे सत्र पाहून शिल्पाच्या या वागण्याविषयी अनेकांनीच सोशल मीडियावर नाराजीही व्यक्त केली. त्यामध्ये टेलिव्हिजन अभिनेत्री काम्या पंजाबीचाही समावेश आहे. ट्विटरवर शिल्पाच्या फॅन क्लबसोबतही काम्याचे खटके उडाले असून तिने एक सूचक ट्विट केलं आहे. ‘तुमच्या मॅडमना सांगा, की जर तिचं हे वागणं असंच सुरु राहिलं तर आयुष्यभर तिला घरातच राहावं लागेल’, असं ट्विट तिने केलं.