बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या आदेशाचे भारतीय जनता पार्टीने स्वागत केले आहे. “सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देणं ही सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या पक्षपाती भूमिकेविरुद्ध एकाप्रकारे दाखवलेली नाराजी आहे” असे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले.

या प्रकरणाचे सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवून तपासात सहकार्य करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश देताच संबित पात्रा यांनी टि्वट केले.

आणखी वाचा- सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पात्रांनी रियाच्या नावावरुन महाराष्ट्र सरकारला डिवचलं; म्हणाले…

या टि्वटमध्ये त्यांनी सुशांतचे कुटुंबीय, न्यूज चॅनल, पत्रकार, बिहार सरकार, केंद्र सरकार आणि सुशांतच्या कुटुंबाच्या वकिलांचे अभिनंदन केलं आहे. अखेर सत्याचा विजय झाला असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले होते.

आणखी वाचा- कोणाला वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते हे महाराष्ट्र सरकारने आता तरी सांगावे : भाजपा

निकालात काय म्हटले आहे?
पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला.पाटणा येथे दाखल झालेला एफआयआर सर्वसमावेशक असल्याचं सुप्रीम कोर्टाने यावेळी सांगितलं. सुशांतच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदविण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही खटल्यांचा तपास सीबीआयने करावा असेही निर्देश कोर्टाने दिले. त्याचप्रमाणे या तपासात सीबीआयला मदत करण्याचे आदेश कोर्टाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने निर्णयाविरोधात दाद मागण्यासंबंधी विचारणा केली. मात्र कोर्टाने त्यासाठी नकार दिला.