गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर फक्त आणि फक्त दोनच चित्रपटांचा दबदबा पाहायला मिळत आहे. हे दोन चित्रपट म्हणजे परफेक्शनिस्ट आमिर खानचा ‘दंगल’ आणि एस. एस. राजमौली यांचा ‘बाहुबली २’. या दोन्ही चित्रपटांचं प्रदर्शन पाहता खऱ्या अर्थाने या चित्रपटांनी भारतीय कलाविश्वाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. सुरुवातीला या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर एक हजार कोटींचा टप्पा सर करुन सर्वांनाच थक्क केलं. आता तर, दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रत्येकी तब्बल १६०० कोटींची कमाई करत एक नवीन शिखर रचलं आहे.

बॉक्स ऑफिसवर एवढ्या मोठ्या प्रमाणात कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये दंगल आणि बाहुबली २ चित्रपटांचा समावेश झाला आहे. आतापर्यंत हा आकडा फक्त याच दोन भारतीय चित्रपटांनी गाठला आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या एस. एस. राजमौली यांच्या ‘बाहुबली २’ या चित्रपटाने आतापर्यंत १६३३ कोटींची कमाई केली असून यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. तर, आमिरच्या ‘दंगल’ चित्रपटाने राजामौलींच्या या बलाढ्य चित्रपटाला चितपट करत १६६५ कोटींचा घसघशीत गल्ला जमवला आहे. काही व्यापार विश्लेषकांनीही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंबंधीची माहिती दिली आहे.

प्रभास, अनुष्का शेट्टी, राणा डग्गुबती यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘बाहुबली २’ने परदेशात जवळपास ३०० कोटींची कमाई केली आहे. तर या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने ५०० कोटींचा आकडा गाठत हिंदी चित्रपटसृष्टीत एक किर्तीमान रचला आहे. ‘दंगल’ चित्रपटाने चीनमधील दमदार प्रदर्शनाच्या जोरावर ‘बाहुबली २’ ला चांगलीच टक्कर दिली आहे. सध्याच्या घडीला या दोन्ही चित्रपटांची घोडदौड पाहता आता आणखी कोणते विक्रम मोडीत निघणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, ‘बाहुबली २’ हा चित्रपट अद्यापही चीनमध्ये प्रदर्शित झाला नाहीये. त्यामुळे येत्या काळात हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा बाहुबलीच्या कमाईचा आलेख उंचावेल यात शंकाच नाही. तुर्तास, ‘बाहुबली’ला धोबीपछाड करण्यात आमिर यशस्वी झाला आहे असंच म्हणावं लागेल.

वाचा: प्रभासशी लग्नाबद्दल अनुष्का म्हणते की…..