विनोदवीर कपिल शर्मा साधारण गेल्या वर्षभरापासून त्याच्या करिअरमधील बऱ्याच अडचणींच्या सामना करत आहे. सहकलाकारांसोबतच्या वादापासून ते आपल्या कार्यक्रमाची कमी झालेली लोकप्रियता या सर्व गोष्टी आणि करिअरला लागलेलं ग्रहण अशा सर्व परिस्थितीचा सामना करताना त्याच्या प्रतिमेलाही कुठेतरी धक्का लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून कपिल चर्चेत आहे ते म्हणजे त्याच्या विक्षीप्त वागण्यामुळे. पण, या प्रसंगातही सहकलाकारांनी त्याची साथ सोडलेली नाही. बऱ्याच टेलिव्हिजन कलाकारांनी कपिलला पाठिंबा दिला असून, त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. यातच आता आणखी एका अभिनेत्रीच्या नावाचा समावेश झाला आहे.

एकेकाळी कपिलच्याच शोमध्ये त्याची सहकलाकार असणारी सुगंधा मिश्रा हिने ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी संवाद साधत कपिलविषयी काही वक्तव्यं केली. गेल्या १२ वर्षांपासून म्हणजे अगदी महाविद्यालयीन दिवसांपासून मी कपिलला ओखळतेय, असं तिने स्पष्ट केलं. कोणी कपिलविषयी तिला काही विचारलं तर तो जसा होता तसाच असून, त्यात काहीच बदल झाला नाहीये असं ती मोठ्या गर्वाने सांगायची.

कपिलच्या वागण्याविषयी सांगावं तर, आता तो काहीसा बदलला असून, पहिल्यासारखा राहिलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून त्याने निवड केलेली प्रत्येक गोष्ट ही त्याला फटका देऊन गेली आहे. मुळात तसा विचारही कोणीच केला नव्हता. जेव्हा आम्ही एका टीममध्ये होतो तेव्हा तर सर्वकाही ठिक होतं. त्यावेळी कपिलला आम्ही कधीच चुकीच्या वाटेवर जाऊ दिलं नाही. पण, आता परिस्थिती बदलली आहे. बहुधा एकाएकी इतकी प्रसिद्धी मिळाल्यामुळे त्याला हे सर्व हाताळता आलेलं नाही. बऱ्याच गोष्टी त्याच्या हातून निसटल्या मुख्य म्हणजे त्याची टीमही. ‘फिरंगी’ या चित्रपटापासूनच त्याच्या वागण्याबोलण्यात हे बदल दिसून येत होते. त्याच्या संपर्कात असणारी नवी लोकं आम्हाला त्याच्यापासून दूर करण्याता प्रयत्न करत होती, असं सुगंधा म्हणाली. यावेळी तिने कपिलच्या तथाकथित प्रेयसीविषयीही काही गोष्टींचा खुलासा केला.

वाचा : सेक्सी दुर्गा चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे अन्यायाविरोधात पंतप्रधानांना पत्र

प्रिती सिमोईसने कपिलला एखाद्या मुलाप्रमाणे सांभाळलं होतं. एखादी गोष्ट करुन घेण्यासाठी लहान मुलांना ज्याप्रमाणे वागवलं जातं त्याचप्रमाणे ती कपिलशी वागत होती, असं सुगंधा म्हणाली. प्रिती आणि कपिलच्या नात्याविषयीसुद्धा बऱ्याच गोष्टी समोर आल्या होत्या. पण, सुगंधाच्या म्हणण्यानुसार कपिलशी कसं वागायचं आणि त्याला कसं हाताळायचं, हे सर्व प्रितीला चांगलच ठाऊक होतं. प्रितीने अपेक्षांपलीकडे जात कपिलची काळजी घेतली होती. कपिलच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीमध्ये समतोल राखण्याचाच ती प्रयत्न करायची. पण, आता मात्र ही सर्व जबाबदारी घेण्यासाठी कपिलसोबत कोणीच नाहीये हेसुद्धा तितकच खरं असल्याचं सुगंधाने स्पष्ट केलं. कपिलची सध्याची अवस्था पाहता त्याच्याविषयी सुगंधाने चिंताही व्यक्त केली. पण, त्याच्या आयुष्यात बळजबरीने घुसून इच्छा असतानाही आपण त्याची मदत करु शकत नाही अशी खंतही तिने व्यक्त केली.