बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांना धारेवर धरले असून, ट्विटरच्या माध्यमातून त्यांना खडे बोल सुनावले आहेत. यासोबतच त्याने एक बोचरा प्रश्नही त्यांच्यासमोर उपास्थित केला. तेव्हा भाजप प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव आता या ट्विटवर काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ‘चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या मंडळींची बौद्धिक क्षमता फार कमी असते’, असं वक्तव्य केल्यामुळे नरसिंह राव यांच्यावर फरहानने आगपाखड केली.

तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय याच्या ‘मेर्सल’ या चित्रपटाविषयी वक्तव्य करत असताना त्यांनी संपूर्ण चित्रपटसृष्टीतील कलाकारांना संताप देईल असे वक्तव्य केले. ‘मेर्सल’ या चित्रपटाने सध्या बरेच विक्रम मोडीत काढले असून, बॉक्स ऑफिस कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने बाजी मारली आहे. पण, विजयच्या या चित्रपटावर भाजपने आक्षेप घेतला आहे. चित्रपटातील काही दृश्यांमध्ये जीएसटी करप्रणाली, नोटाबंदी आणि डिजिटल इंडियाविषयी गैरसमज निर्माण करणारी माहिती देण्यात आली असून ती आक्षेपार्ह पद्धतीने चित्रीत करण्यात आल्याचं भाजपचं म्हणणं आहे.

सरकारने लागू केलेल्या जीएसटी करप्रणालीचा सर्वसामान्यांना दूरदूरपर्यंत काहीच फायदा होत नाही, असा संदेश या चित्रपटातून पोहोचत आहे. त्यामुळे असे दृश्य चित्रपटातून काढून टाकण्यात यावे अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. या चित्रपटाच्या मुद्द्यावरुन सध्या बऱ्याच चर्चा सुरु असून राजकीय नेत्यांनींही यात उडी घेतली होती. यासंदर्भातच एका वादविवाद कार्यक्रमामध्ये राव यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता आणखी एका विषयाला वाचा फोडली आहे.

राष्ट्रीय पातळीवरील वाहिनीवर त्यांनी, चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या मंडळींची बौद्धिक क्षमता कमी असते, असं वक्तव्य केलं होतं. फरहान अख्तरने त्यांच्या याच वक्तव्याला निशाणा करत ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. ‘तुमची हिंमत कशी झाली असं बोलण्याची?’, असा प्रश्न उपस्थित करत फरहानने चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या सर्वांनाच उद्देशून एक लिंकही शेअर केली आहे. ज्यामध्ये त्या कार्यक्रमाचा व्हिडिओ आहे. तेव्हा आता चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळी या सर्व प्रकरणावर व्यक्त होणार की मौन बाळगणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.