जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवरील दहशतवादी हल्ल्याचा बॉलिवूड कलाकारांनी निषेध केलाय. या हल्ल्यात सात यात्रेकरूंचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. सोशल मीडियावर बॉलिवूड कलाकारांनी हल्ल्याचा निषेध करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. अक्षय कुमार, शाहरूख खान, वरूण धवन, हुमा कुरेशी आणि मधुर भंडारकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केलाय. निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात बॉलिवूड कलाकारांनी तीव्र द्वेष व्यक्त केला.

‘निष्पाप लोकांचा बळी गेल्याने मी दु:खी आहे. पीडितांसाठी प्रार्थना, मृतांच्या कुटुंबियांना देव शक्ती देवो’, असे शाहरूख खानने ट्विट केले. तर, ‘अमरनाथ यात्रेतील निर्दोष भाविकांवरील हल्ला निंदनीय आहे. याचा रागही आलाय आणि दुःखही आहे,’ असे ट्विट अक्षय कुमारने केले.
अभिनेत्री स्वरा भास्करने घृणास्पद आणि क्रूर अशा शब्दांत या हल्ल्याचा निषेध केलाय. अमानुष दहशतवादी हल्ल्याचा मी निषेध करते असे स्वराने ट्विट केले. अभिनेत्री हुमा कुरेशीने एकता आणि बंधुभावचा संदेश दिलाय. ‘काश्मिरी मुस्लिमांनी गेल्या अनेक वर्षांपासून हिंदूंना अमरनाथ यात्रेसाठी मदत केलीये. आम्ही या दहशतवाद्यांच्या द्वेषाला जिंकू देणार नाही,’ असे तिने ट्विट केले.

वाचा : कतरिनापेक्षा दीपिकासोबतच रणबीरची जोडी हिट!

दिग्दर्शक मधुर भांडारकर, हंसल मेहता, शेखर कपूर आणि महेश भट्ट यांनीदेखील हल्ल्याचा निषेध करत ट्विट केले. तर महेश भट्ट यांनी या हल्ल्याविरोधात देशातील नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले.

अमरनाथ यात्रेतील भाविकांवर दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये कावड यात्रेचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.