अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी ताबा मिळवला आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये दहशत माजवली असून तिथल्या नागरिकांवर देश सोडण्याची वेळ आली आहे. अफगाणिस्तानमधील भीषण परिस्थितीवर अनेक बॉलिवूड कलाकारांनी चिंता व्यक्त केलीय. अशातच मुळची अफगाणिस्तानची असलेली अभिनेत्री वरीना हुसैनने देखील तिथल्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केलीय.

वरीनाने अफगाणिस्तानवरील परिस्थितीवर चिंता व्यक्त करत लोकांना मदत करण्याचं आवाहन केलंय. २० वर्षांपूर्वी तालिबान्यांमुळे वरीनाच्या कुटुंबाला अफगाणिस्तान सोडावं लागलं होतं. एका मुलाखतीत वरीनाने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. सध्या तिथे जी परिस्थिती आहे तशीच २० वर्षांपूर्वी होती ज्यामुळे तिच्या कुटुंबावर देश सोडण्याची वेळ आली होती. असं वरीना म्हणाली. ती म्हणाली, “मी भारतात १० वर्षाहून अधिक काळ झाला राहतेय. मात्र एका चांगल्या आयुष्यासाठी एका देशातून दुसऱ्या देशात भटकणं खूपच कठीण आणि त्रासदायक असतं. आम्ही नशीबवान आहेत की आम्हाला भारतात रहायला मिळालं” असं वरीना म्हणाली.

पहा फोटो:अफगाणी असल्याने ‘या’ अभिनेत्रीला व्हावं लागलं होतं ट्रोल; सलमान खानने केलं होतं लॉन्च

पुढे वरीना म्हणाली, ” अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही वर्षात झालेला विकास आता पुन्हा एकदा ढासळू लागेल. देश पुन्हा एकदा त्यात जुन्या वाटेवर जाऊ लागला आहे. पुन्हा एकदा तिथे आता महिलांना केवळ मुलं जन्माला घालणारं मशिन बनवलं जाईल आणि तरुणांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल.”

वरीनाने हुसैनने सलमान खानच्या ‘लवरात्री’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सिनेमाच्या रिलीजवेळी वरीनाने ती अफगाणी असल्याने तिला अनेकांनी ट्रोल केल्याचा खुलास केला होता.