गेल्या काही आठवड्यांपासून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि ‘पद्मावती’ चित्रपटाच्या वादांवर येणारी वक्तव्यं चर्चेचा विषय ठरत आहेत. त्याचप्रमाणे गोव्यात झालेल्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’तून (इफ्फी) ‘एस दुर्गा’ आणि ‘न्यूड’ चित्रपटांचे स्क्रीनिंग वगळण्यात आल्याने हा विषयदेखील सर्वांचे लक्ष वेधणारा ठरला. यावरून काही दिग्दर्शक आणि सेलिब्रिटींनी ‘इफ्फी’वर बहिष्कारही घातल्याचे पाहायला मिळाले. मात्र, अशा मोठ्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालणे चुकीचे असून, हा कोणत्याही गोष्टीवरील तोडगा नसल्याचे मत अभिनेत्री सई ताम्हणकरने मांडले.
वाचा : भाभीजी म्हणते, त्या केवळ अफवा
‘टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सई म्हणाली की, एखाद्या चित्रपटाशी अनेक लोक जोडलेले असतात. त्यांचे अथक परिश्रम चित्रपटामागे असतात. त्यामुळे जर जागतिक स्तरावर ओळख मिळण्याने त्यांच्या परिश्रमांचे चीज होणार असेल तर नक्कीच त्यांनी ही संधी दवडता कामा नये. पण त्याचसोबत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली गळचेपी करणेही चुकीचे आहे.
वाचा : फरहान अख्तरचे ‘ते’ स्वप्न अधुरेच
पुढे सई म्हणाली की, केवळ पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहून त्याचे परीक्षण करू नये. मी इफ्फीमध्ये गेले होते. त्यामुळे हे सर्व घडत असताना त्यावेळी कसे वाटते याची मला पुरेपूर जाणीव आहे. मला वाटतं आपण कोणाच्या वैयक्तिक किंवा राजकीय मतांचा विचार न करता केवळ चित्रपटाचा आणि आपल्या कामाचा विचार करायला हवा. अशाप्रकारे वाद निर्माण करून काहीच उपयोग नाही. नुकताच ‘इफ्फी’ महोत्सवाचा सांगता समारंभ झाला. त्यावेळी सईसुद्धा तेथे उपस्थित होती.