कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासूनच यातील सेलिब्रिटी गायक आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मनं जिंकत आहेत. कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामधील कॅप्टनना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला. येत्या सोमवार, मंगळवार आणि बुधवारच्या भागामध्येदेखील असेच काहीसे घडले. वायकॉम१८ मोशन पिक्चर्स व अजय देवगण प्रस्तुत आगामी ‘आपला मानूस’ हा चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. याच निमित्ताने चित्रपटाची संपूर्ण टीम ‘सूर नवा ध्यास नवा’च्या मंचावर आली.

या विशेष भागामध्ये नानांच्या आपल्या माणसांची गाणी स्पर्धकांनी सादर केली. कार्यक्रमामधील सर्वच स्पर्धकांनी त्यांच्या अप्रतिम गाण्याने नाना पाटेकरांचे मन जिंकले. सूर नवाच्या मंचावर गाण्याच्या मैफिलीसोबत गप्पांची मैपलही तेवढीच रंगली. यावेळी नाना पाटेकर, इरावती हर्षे, सुमित राघवन आणि चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे उपस्थितीत होते. या विशेष भागाची सुरुवात ‘तू बुद्धी दे’ या ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ सिनेमाच्या गाण्यापासून झाली. स्पर्धकांनी एकापेक्षा एक गाणी सादर केली. श्रीनिधीने ‘उष:काल होता होता’ हे आशा भोसलेंचे गाणे सादर केले. तर निहीराने ‘एकाच या जन्मी जणू’ हे गाणं तिच्या मधुर आवाजात सादर केले.

नानांनी स्पर्धकांच्या गाण्यांदरम्यानच निळूभाऊ, अशोक सराफ आणि ज्येष्ठ श्रेष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. याचबरोबर विक्रम गोखले यांनी दिलेली कौतुकाची शाबासकी अजूनही लक्षात असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. शरयु दातेने किशोरीताई आमोणकर यांचे ‘सहेला रे’ तसेच अनिरुद्ध जोशीने ‘बगळ्यांची माळ फुले’ हे गाणे सादर केले. या दोघांच्या गाण्यांनी नानांचे मन जिंकले.

यानंतर प्रेसेनजीत कोसंबीने अवधूत गुप्तेचे पत्रास कारण की हे गाणे सादर केले. प्रेसेनजीत कोसंबीच्या ‘पत्रास कारण की’ हे अवधूत गुप्तेचं गाण सादर केले. हे गाणे ऐकल्यावर तिथे उपस्थितीत सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी तरळले. गंभीर वातावरणानंतर नाना पाटेकर यांना एक छोटेसे सरप्राइज मिळाले. नानांसमोरच त्यांचे ‘ओठ रसिले तेरे ओठ रसिले’ हे गाणे सादर झाले, ज्यावर सगळेच थिरकले. सगळ्याच स्पर्धकांनी गाणी उत्तम पद्धतीने सादर करून आपल्या कॅप्टनसनचे आणि ‘आपला मानूस’च्या टीमचे मन जिंकले पण या आठवड्यात मानाची सुवर्ण कट्यार कुणाला मिळणार हे बघणंही उत्सुकतेचं ठरेल. येत्या सोमवार, मंगळवार आणि बुधवारच्या भागात प्रेक्षकांना नाना पाटेकरांच्या अशा अनेक आठवणी आणि त्यांचा प्रवास नव्याने अनुभवायला मिळणार आहे.

नानांनी मंचावर त्यांच्या अनमोल आठवणींचा ठेवा प्रेक्षकांबरोबर शेअर केला. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंतच्या प्रवासापर्यंत खूप काही शिकण्यासारखे आहे. तेव्हा पाहायला विसरू नका ‘सूर नवा ध्यास नवा’चा ‘आपला मानूस’ विशेष भाग नाना पाटेकर आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत ५ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.