अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा इटलीत राजेशाही थाटात विवाहसोहळा पार पडला. देशभरात या लग्नाची चर्चा झाली. मोजके कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत दीप-वीरचा विवाह संपन्न झाला. या लग्नाच्या फोटोंची सर्वांनाच उत्सुकता होती. पण पाहुण्यांना मोबाइल न आणण्यास सांगितल्याने आणि कडक नियमांमुळे एकही फोटो व्हायरल होऊ दिला नव्हता. हा विवाहसोहळा इतक्या खासगी पद्धतीने करण्यामागचं कारण आता दीपिकाने सांगितलं आहे. लग्नानंतर दिलेल्या एका मुलाखतीत तिने या गोष्टी सांगितल्या आहेत. 'लग्नानंतर आम्ही शेअर केलेल्या फोटोंमधून संपूर्ण विवाहसोहळ्याची कल्पना येते. तुमचे जवळचे व्यक्ती या समारंभाला उपस्थित राहणं महत्त्वाचं असतं. सेलिब्रिटी म्हणून आमची काय ओळख आहे हे बाजूला ठेवून व्यक्ती म्हणून आम्हाला ओळखणाऱ्यांना जवळच्या मंडळींनाच आम्ही आमंत्रित केलं होतं,' असं ती म्हणाली. लग्नात जे उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्यासाठी दीप-वीरने बेंगळुरू आणि मुंबईत रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. याआधी अनुष्का-विराटनेही अशाच प्रकारे खासगी पद्धतीने लग्नगाठ बांधली. इटलीतच अनुष्का-विराटचा लग्नसोहळा पार पडला आणि त्यानंतर दिल्ली, मुंबईत त्यांनी रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. दीप-वीरच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सोशल मीडियावर फोटो शेअर करण्यात आले. तोपर्यंत संपूर्ण देशाला त्यांच्या फोटोंची उत्सुकता होती.