कॉमेडियन भारती सिंहला ड्रग्ज सेवन प्रकरणात अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. शनिवारी सकाळी या पथकाने भारती सिंहच्या घरावर आणि त्यानंतर कार्यालयावर धाड टाकली. यावेळी झालेल्या झाडाझडीत भारतीच्या घरात गांजा आढळला आहे. तो एनसीबीच्या पथकाने जप्त केला. भारती आणि तिचा पती या दोघांनीही गांजा बाळगल्याचे मान्य केले आहे. दरम्यान कॉमेडीयन राजू श्रीवास्तवने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

नुकताच राजू यांनी आजतकला मुलाखत दिली. त्यावेळी तो म्हणाला, ‘मला यावर विश्वासच बसत नाही. हे ऐकून मला धक्काच बसला. बॉलिवूडमध्ये हे काय सुरु आहे आणि कलाकार देखील असे का वागत आहेत? सुरुवातीला मला वाटले की कोणीतरी भारती आणि हर्षचे चुकून नाव घेतले. पण आता असे समजेल की त्यांनी अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिली.’

‘काय गरज होती ड्रग्ज घ्यायची. ड्रग्ज न घेता कॉमेडी करु शकत नाही का? मी भारतीसोबत खूप वेळा काम केले आहे. मी तिच्या लग्नाला देखील गेलो होतो. तिच्या लग्नात सर्वजण रात्रभर डांस करत होते, कॉमेडी सुरु होती. मी त्यावेळी या गोष्टीचा विचार देखील केला नाही. आम्ही सगळे भारतीची किती प्रशंसा करत असतो. अनेक मुले तिला आदर्श मानत होते. इंडस्ट्रीमधील सर्वचजण असे नाहीत. पण दररोज बॉलिवूडमधील कोणाचे ना कोणाचे नाव समोर येत आहे. आता टीव्ही कलाकारांची नावे येत आहेत. मला अतिशय दु:ख झाले आहे’ असे राजू श्रीवास्तव पुढे म्हणाला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आले. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर आली होती. या यादीत आता प्रसिद्धी कॉमेडियन भारती सिंह हिचं देखील नाव समोर आलं आहे. एनसीबीने भारती आणि तिचा पती हर्ष यांना समन्स बजावलं होतं. आता त्या दोघांनाही अटकही करण्यात आली आहे.