रंगभूमी म्हणजे एक वेगळंच जग आहे. रंगभूमीची झिंग एकदा का चढली की ती आजन्म त्या व्यक्तीसोबतच असते. रंगभूमीच्या जगात तुम्ही विविध अनुभव घेत समृद्ध होत असता. अशा या रंगभूमीविषयीचे कलाकारांचे अनुभव आपण या सदरातून अनुभवले. आतापर्यंत अनेकांनी आपल्या कष्टाने आणि एकनिष्ठेने मराठी रंगभूमी गाजवली. जेवढं नितातं प्रेम कलाकारांनी या रंगभूमीवर केलं, तेवढंच प्रेम रंगभूमीनेही त्यांना दिलं. गेली २५ वर्षे मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता पुष्कर श्रोत्री याने त्याचे काही रंगभूमीवरचे अनुभव ‘लोकसत्ता ऑनलाइन’कडे शेअर केले.

माझ्या आयुष्यात रंगभूमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माझं एकतरी नाटक सतत सुरू राहावं असंच मला वाटतं. म्हणूनच ‘हसवा फसवी’ या नाटकाचे २५० प्रयोग झाल्यानंतर मी ‘सुरक्षित अंतर ठेवा’ हे दुसरं नाटक करायला घेतलं. नाटकांमुळे अभिनयाचा पाया भक्कम होतो. नाटक करताना सतत अपडेट राहावं लागतं. या सगळ्या प्रक्रियेमधून जो अनुभव मिळतो तो आयुष्यभर पुरणारा असतो.

‘सुरक्षित अंतर ठेवा’ या नाटकाचा विषयच मला फार आवडला होता. सध्या अगदी क्षुल्लक गोष्टींवरून घटस्फोट घेतले जातात. त्यातही अरेंज मॅरेज चांगले की लव्ह मॅरेज असा एक खटला नाटकात भरवला जातो आणि त्यात मी वकिलाच्या भूमिकेत आहे. हा वकील दोन्ही पक्षांची बाजू मांडतो.

या नाटकाची खास बात म्हणजे या खटल्याचे न्यायाधीश हे प्रेक्षक असतात. नाटकाच्या शेवटी प्रेक्षकच खराखुरा निकाल देतात. लव्ह मॅरेजसाठी लाल झेंडे दाखवले जातात तर अरेंज मॅरेजसाठी हिरवा कंदील दाखवला जातो. अगदी विनोदी पद्धतीने घटस्फोटाचा विषय या नाटकात मांडण्यात आला आहे.

आतापर्यंत मी २५ पेक्षाही जास्त व्यावसायिक नाटकांमध्ये काम केले. पण प्रत्येक नाटकाच्या प्रयोगावेळी मी पहिल्यांदाच रंगभूमीवर उभा राहिलो आहे असं मला वाटतं. सध्या ‘हसवा फसवी’ आणि ‘सुरक्षित अंतर ठेवा’ या दोन नाटकांचे प्रयोग एकाच दिवशी मागेपुढे लागतात. पण जेव्हा मी रंगभूमीवर जातो तेव्हा आधीच्या प्रयोगाचा कितीही थकवा असला तरी तो तिथे गेल्यावर विरून जातो.

हे वर्ष माझ्यासाठी खूप खास आहे. हे माझं व्यावसायिक रंगभूमीवरच २५ वं वर्ष. मी मालिकांमध्ये काम करणं तसं फार आधीच सोडून दिलं. मी तिथे कधी रमलो नाही, त्यापेक्षा मला सिनेमे आणि नाटकात काम करायला जास्त आवडते. स्वतःच्या क्षमता सतत पडताळून पाहायच्या असतील तर रंगभूमीवर काम करण्याशिवाय गत्यंतर नाही. सध्याची तरुण पिढीही रंगभूमीकडे वळताना दिसते. पण तरीही त्यांनी योग्य नाटकाची निवड केली पाहिजे, ज्यातून त्यांना खूप काही शिकायला मिळेल.

मला ‘हसवा फसवी’ या नाटकाच्या प्रयोगावेळचा एक किस्सा आठवतो. नाटकाचा प्रयोग जसा संपला तेव्हा एक वयोवृद्ध गृहस्थ मला भेटायला आले आणि ढसाढसा रडू लागले. त्यांना रडताना पाहून मी हेलावून गेलो. त्यांनी नंतर मला चक्क नमस्कार केला. मला दोन क्षण काही कळलंच नाही. तुम्ही असं करू नका, मी फार लहान आहे असं सांगितल्यावर ते म्हणाले की, मी तुमच्या वयाला नाही तर तुमच्यातल्या कलाकाराला नमस्कार करत आहे. तो क्षण माझ्या मनात कायमचा कोरला गेला आहे.