हिंदी चित्रपटसृष्टीत फिरोज खान त्यांच्या वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध होते. मनमुरादपणे जीवन जगण्याच्या वृत्तीमुळे ते इतक कलाकारांपेक्षा नेहमीच वेगळे ठरले. त्यांच्या संवादफेकीवर तेव्हाच्या अनेक तरूणी घायाळ होत्या. नायक म्हणून फिरोज यांना जेवढी पसंती मिळाली, किंबहूना त्याहून जास्त पसंती ही खलनायक म्हणून मिळाली. अफगाणिस्तानाहून स्थलांतरित होऊन आलेल्या एका पठाण कुटुंबामध्ये २५ सप्टेंबर १९३९ मध्ये फिरोज खान यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब गजनी येथे राहणारे होते. फिरोज यांची आई ईराणी होती. फिरोज यांच्या स्वभावामुळे जनरल परवेझ मुशर्रफ यांनी त्यांना पाकिस्तानात येण्यावर बंदी घातली होती. फिरोज खान आपली मते ठामपणे मांडत. २००६ मध्ये त्यांच्यावर पाकिस्तानात जाण्यास बंदी घालण्यात आली होती. त्याचे झाले असे की, भाऊ अकबर खान याचा 'ताजमहल' हा सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित करण्यासाठी जेव्हा फिरोज लाहोरला गेले होते, तेव्हा त्यांनी भारत आणि पाकिस्तानातील मुस्लिमांच्या परिस्थितीवर भाष्य केले होते. पाकिस्तानात एका कार्यक्रमात भारतातील मुस्लिमांची परिस्थिती गंभीर असण्याबाबत प्रश्न केला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना फिरोज म्हणाले की, 'भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. आमच्याकडे मुसलमान प्रगती करत आहेत. आमचे राष्ट्रपती मुस्लिम आहेत तर पंतप्रधान शीख. पाकिस्तान इस्लामच्या नावावर घडला होता. पण आज या देशाची अवस्था बघा काय झालीये, इथलेच लोक एकमेकांना मारत आहेत, असे परखड विचार त्यांनी मांडले. एवढे बोलून ते थांबले नाहीत, ते पुढे म्हणाले की, 'इथे मी स्वतःहून आलेलो नाही. मी इथे यावं यासाठी मला आमंत्रण देण्यात आलं होतं. आमचे (भारतीय) सिनेमे एवढे प्रभावी असतात की, तुमचे सरकार त्याच्यावर जास्तवेळ बंदी घालू शकत नाही', असे त्यांनी म्हटले. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे फिरोज खान यांच्या जाहीर वक्तव्याने पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली होती. तेव्हा संतापलेल्या मुशर्रफ यांनी फिरोज खान यांच्यावर पाकिस्तानात येण्याची बंदी घातली होती.