बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. एकीकडे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाची तारिख जाहीर झाली. तर दुसरीकडे प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा साखरपुडा पार पडला. आता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाकडेही अनेकांचं लक्ष आहे. पुढच्या वर्षी ही जोडीसुद्धा विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता रणबीरनेही मौन सोडलं आहे.

‘लग्नाबाबतच्या सर्व चर्चा या ज्यांच्या- त्यांच्या व्यवसायाचाच एक भाग आहे. एका चर्चेपासून दुसरी चर्चा आणि मग तिसरी..अशाप्रकारे अफवा पसरतच जातात. लग्न ही अशी गोष्ट आहे जी योग्य त्या वेळी घडून येते. मी ३५ वर्षांचा झालो आहे, आता लग्न केलं पाहिजे, असं ठरवून करता येत नाही. तुम्ही आणि तुमचा साथीदार मिळून याबाबत विचार केला तर योग्य वेळी सर्व गोष्टी होतात. पण मी सध्या लग्नाबाबत विचार केला नाही,’ असं रणबीर म्हणाला.

Kerala Floods : पूरग्रस्तांसाठी गाण्यातून ए. आर. रेहमानचा प्रेरणादायी संदेश

‘ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटात रणबीर- आलिया एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच दोघांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. सोनम कपूरच्या लग्नात या दोघांना एकत्र पाहिलं गेलं आणि तिथूनच त्यांच्या अफेअरविषयी चर्चा सुरू झाल्या.