बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप करत मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. त्यानंतर शिवसेना आणि कंगना यांच्यामध्ये ट्विटरवर वाद सुरु असल्याचे दिसत आहे. अशातच कंगनाने आणखी एक ट्विट करत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर असे म्हटले आहे. सध्या तिचे हे ट्विट चर्चेत आहे.

कंगनाने ट्विटमध्ये सरकार बॉलिवूडमधील ड्रग्स माफियांना पाठिशी घालत आहे असे म्हटले आहे. तसेच ठाकरे सरकारवर निशाणा साधत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असते तर जनतेला न्यायासाठी संघर्ष करावा लागला नसता असे पुढे म्हटले आहे. इतकच नव्हे तर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य मार्गाने झाला असता असे देखील तिने अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.

आणखी वाचा- कंगनाने केलं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ट्विट, म्हणाली…

‘सध्या राज्यात सत्तेत असणारी भ्रष्ट सोनिया सेना जी माफियांना पाठिंबा देते, त्या ऐवजी जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर मुंबई पोलिसांनी त्यांचे काम योग्य पद्धतीने केले असते. नागरिक आणि जनतेला त्यांच्या न्यायासाठी संघर्ष करावा लागला नसता’ या आशयाचे ट्विट करत कंगनाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.