गूढ आणि थराराने परिपूर्ण अशी मालिका म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले.’ झी मराठी वाहिनीवरील या मालिकेच्या दोन्ही भागांनी, ‘रात्रीस खेळ चाले’ आणि ‘रात्रीस खेळ चाले २’ने प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले होते. या मालिकेतील अण्णा नाईक, शेवंता, दत्ता, माधव, पांडू, वच्छी या व्यक्तिरेखांनाही प्रेक्षकांचे प्रेम मिळाले होते. आता आण्णा नाईक पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

झी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अण्णा नाईक यांचा चेहरा अंधारात दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी ‘अण्णा नाईक परत येणार…!! लवकरच’ असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या पहिल्या भागामध्ये प्रॉपर्टीसाठी घरात सुरु असलेले राजकारण, खून प्रकरण हे सर्व काही दाखवण्यात आले होते. त्यानंतर ‘रात्रीस खेळ चाले २’मध्ये २० वर्षांपूर्वीची कहाणी दाखवण्यात आली होती. या भागातील अण्णा नाईक आणि शेवंताच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर जणू काही जादूच केली होती. पण मालिकेच्या शेवटी शेवंता आणि अण्णा यांचा मृत्यू होतो. त्यामुळे आता ‘रात्रीस खेळ चाले ३’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार यासाठी चाहते उत्सुक आहेत.