बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना रणौतने नुकत्याच ‘आयएएनएस’ला ई-मेलच्या माध्यमातून दिलेल्या एका मुलाखतीत पुन्हा एकदा इंडस्ट्रीवर हल्लाबोल केला आहे. बॉलिवूडमध्ये स्वत:च्या मतांवर ठाम राहणे अवघड आहे कारण इथे लोक नेहमी दुसऱ्याला कमजोर ठरवतात, असे तिचे म्हणणे आहे. या सर्वांविरुद्ध कायम लढत राहणार असल्याचंही तिने म्हटले. यामुळे हृतिकसंदर्भात केलेल्या वक्तव्यांनंतर आता कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

‘मी या इंडस्ट्रीत बाहेरून आल्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी मला संघर्ष करावाच लागेल. मलाही स्वत:ची मते आहेत आणि ती मुक्तपणे इतरांसमोर मांडण्याचा पर्याय मी निवडते. पण त्यामुळे काही लोक तुम्हाला दुबळे ठरवण्याचा प्रयत्न करतात. याविरोधात लढण्यासाठी तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवावा लागेल. चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवलाच पाहिजे. माझ्या प्रत्येक कृतीतून मी महिलांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करते. माझा लढा अन्य महिलांना प्रेरित करेल, अशी मी आशा करते,’ असे कंगना म्हणाली.

VIDEO : ‘केबीसी’च्या सेटवर युवराज सिंगला अश्रू अनावर; बिग बीसुद्धा झाले भावूक

कंगना- हृतिकच्या वादानंतर बॉलिवूडमध्ये जणू काही दोन गटच निर्माण झाले आहेत. यातील एक गट कंगनाच्या बाजूने आहे तर दुसरा तिच्या विरोधात. करण जोहर, हृतिक रोशन, राकेश रोशन, आदित्य पांचोली यांच्याविरोधात तिने बेधडक वक्तव्ये केली होती. यासाठी तिला अनेकांचा रोषही पत्करावा लागला. इतकेच नव्हे तर काही जण बॉलिवूड पार्ट्यांमध्येही तिला निमंत्रित करणे टाळू लागले.