‘कटप्पाने बाहुबलीला का मारलं?’, या प्रश्नानंतर सध्या अनेकांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या आठवड्यात लग्न करणार आहेत का? भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या आठवड्यापासून होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात जॅकलिन फर्नांडिसने या चर्चांना थोड्याफार प्रमाणात पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

१२ डिसेंबर म्हणजेच मंगळवारी विराट- अनुष्का इटलीमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे. इटलीत लग्न कुठे होणार, कोणकोणत्या सेलिब्रिटींना आमंत्रित केलं गेलं, मुंबईत रिसेप्शन होणार का, अशा एक ना अनेक गोष्टींची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. मात्र, लग्नाबाबत कोणतीही ठोस माहिती अद्याप समोर आली नव्हती. अनुष्का आणि तिच्या कुटुंबीयांना मुंबई विमानतळावरून इटलीसाठी रवाना होताना पाहिलं गेलं, त्यावरूनच अंदाज खरा ठरल्याचं म्हटलं जात आहे. रविवारी ‘लक्स गोल्डन रोझ अवॉर्ड्स’ सोहळा पार पडला. बॉलिवूडचे बरेच कलाकार या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी रेड कार्पेटवर अनेकांना विरुष्काच्या लग्नाविषयी विचारलं गेलं. त्यापैकी काहींनी लग्न खरंच होतंय का, असाच प्रश्न प्रसारमाध्यमांना विचारला. मात्र, विरुष्काच्या लग्नाचा उत्साह जॅकलिनला लपवता आला नाही.

https://www.instagram.com/p/BciNgVRn68q/

अनुष्का आणि विराटला कशाप्रकारे शुभेच्छा देशील असा प्रश्न तिला विचारण्यात आला. तेव्हा जॅकलिनच्या चेहऱ्यावर उत्सुकता सहज पाहायला मिळत होती. ‘मी खूप उत्सुक आहे. ही खूप चांगली बातमी आहे आणि अनुष्का- विराटसाठी मी खूप खूश आहे,’ असं ती म्हणाली.
एकीकडे कतरिना कैफ, करिना कपूर, माधुरी दीक्षित यांनी लग्नावर बोलण्यास नकार दिला असताना जॅकलिनने मात्र साफ इशारा दिला असं म्हणायला हरकत नाही.