अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर कलाविश्वात एक पोकळी निर्माण झाली. तीनशे चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्रीने तिच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला. फक्त रुपेरी पडद्यावरच नव्हे, तर खासगी आयुष्यातही 'श्री' खऱ्या अर्थाने सुपरहिट ठरल्याचा प्रत्यय वेळोवेळी आलाच. त्यांच्या जाण्यानंतर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने 'श्री'विषयी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. पती बोनी कपूर यांनी आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग निघून गेल्याचं दु:ख एका पत्रातून व्यक्त केल्यानंतर आता श्रीदेवी यांच्या मुलीने म्हणजेच जान्हवी कपूरने एक पत्र लिहित श्रीदेवी यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या अतिशय भावनिक पत्रातून जान्हवीने तिच्या आईसोबतचं नातं सर्वांसमोर ठेवलं आहे. पत्रासोबतच तिने काही सुरेख फोटोही जोडले आहेत. ते फोटो पाहता 'श्री' नेमक्या कपूर कुटुंबियांसाठी कोण होत्या, याचा सहज अंदाज लावता येतोय. सध्याच्या घडीला आपली आई सोबत नसली तरीही तिचं अस्तित्व मात्र आपल्यात कायम आहे, असं म्हणत जान्हवीने लिहिलंय, 'माझ्या आयुष्यात आता तू नसलीस तरीही तुझ्या प्रेमाची अनुभूती मला अजूनही होतेय. दु:ख आणि त्रास या साऱ्यापासून तू माझं रक्षण करतेयस असा भास मला होतोय. प्रत्येक वेळी डोळे बंद केल्यावर चांगल्याच गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येण्यास सुरुवात होतेय.' वाचा : ‘ख्वाबों की शहजादी’ निघून जाते तेव्हा… वाचा : श्रीदेवी यांच्या निधनामुळे मी सर्वस्व गमावले, बोनी कपूर यांचा ट्विट जान्हवीने हे पत्र पोस्ट करत त्यासोबत लिहिलेल्या कॅप्शनमधून आपल्या आई- वडिलांच्या नात्याकडे सर्वांनीच आदराने पाहावे अशी विनंती केली. 'एक गोष्ट लक्षात असूद्या की, आई आणि बाबांमध्ये असणारं प्रेम हा तिच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग होता. त्यांचं प्रेम अमर आहे, कारण त्यासारखी कोणतीच दुसरी गोष्ट या जगात अस्तित्वात नाही. त्यामुळे मी विनंती करते की तुम्ही त्यांच्या नात्याचा आदर करा. त्यांच्या नात्याविषयी वेडवाकडं बोललं गेलेलं ऐकून खूप दु:ख होतं. मी आणि खुशीने आमच्या आईला गमावलंय. पण, बाबांनी तर त्यांची 'जान' गमावलीये. एक आई आणि पत्नी यापलीकडे जाऊन तिने प्रत्येक भूमिका चोखपणे बजावली होती', असं जान्हवीने लिहिलं. आईसोबतची प्रत्येक आठवण आणि तिच्या जाण्याने मनात दाटून आलेल्या सर्व भावनांना जान्हवीने या पत्राद्वारे वाट मोकळी करुन दिली. गेल्या काही दिवसांपासून सर्वांनीच आपल्या कुटुंबाप्रती दाखवलेल्या आपुलकीसाठी तिने सर्वांचे आभारही मानले.