बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात काही बॉलिवूड कलाकारांनी एकत्र येऊन याचिका दाखल केली आहे. दरम्यान त्यांच्या या कृतीवर अभिनेत्री कंगना रणौत हिने संताप व्यक्त केला. आता कळलं का संपूर्ण जगासमोर इभ्रतीचे वाभाडे निघाल्यावर कसं वाटतं? असा सवाल तिने कोर्टाचा दरवाजा ठोठावणाऱ्या कलाकारांना केला आहे.

अवश्य पाहा – “आरे कारशेड सर्व मुंबईकरांची समस्या नाही”; कंगना रणौतचा उद्धव ठाकरेंना टोला

अवश्य पाहा – ऑनस्क्रीन ‘नागिन’चा बोल्ड अंदाज; पाहा मौनी रॉयचं हॉट फोटोशूट

“बॉलिवूडच्या गटारात रेंगाळणाऱ्यांना आता कळलं का संपूर्ण जगासमोर अपमान केल्यावर कसं वाटतं? कित्येक वर्षांपासून मी स्वत: बॉलिवूडविरोधात शोषण, बदनामीची तक्रार केली. अन् त्याचमुळे आज एका कलाकाराचा मृत्यूही झाला. जर सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडचं गटार स्वच्छ होतंय तर यांना त्रास का होतोय. याचाही सर्व हिशेब माझ्याकडे आहे.” अशा आशयाची दोन ट्विट करुन कंगनाने आपला संताप व्यक्त केला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

दिल्लीतील कोर्टात या चार जणांविरोधात आणि दोन चॅनल्स विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, अजय देवगण, करण जोहर, अक्षय कुमार, आदित्य चोप्रा, फरहान अख्तर, झोया अख्तर यांच्यासह महत्त्वाच्या प्रॉडक्शन हाऊसेसचा समावेश आहे. द फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर गिल्ड ऑफ इंडिया आणि सिने टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन यांचाही याचिकाकर्त्यांमध्ये समावेश आहे. बॉलिवूडमधल्या कलाकारांविरोधात डर्ट, फिल्थ, स्कम, ड्रगीज अशा शब्दांचा वापर करण्यात आला आहे. या सगळ्यामुळे बॉलिवूडची बदनामी झाली. हे शब्द सिनेसृष्टीसाठी अपमानजनक आहेत असंही या याचिकेत म्हटलं आहे.