बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर घराणेशाही हा वाद पेटून उठला. अनेक कलाकारांनी त्यांना आलेले बॉलिवूडमधील अनुभव सांगितले तर काहींनी बॉलिवूड सोडण्यामागचे कारण सांगितले. अशातच ऑस्कर विजेते ए. आर. रेहमान यांनी धक्कादायक खुलासा केला. इंडस्ट्रीमध्ये आपल्या विरोधात एक गट अफवा पसरवत आहे, असा आरोप रेहमान यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर कंगना रणौतने तिची प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने नुकताच एक ट्विट केले आहे. 'प्रत्येकाला इंडस्ट्रीमध्ये हा अनुभव येतो. खासकरुन जेव्हा तुम्ही एकटे आणि स्वतंत्र व्यक्ती म्हणून राहण्याचा प्रयत्न करता' असे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे. तिच्या या ट्विटला अनेकांनी पाठींबा दिला आहे. Everyone experiences harassment and bullying in this industry especially when you act autonomous and become totally — Team Kangana Ranaut (@KanganaTeam) July 25, 2020 काय म्हणाले होते रेहमान? हल्ली तुम्ही कमी चित्रपटांमध्ये संगीत दिग्दर्शन का करता असा सवाल रेहमान यांना एका मुलाखतीदरम्यान करण्यात आला होता. यावर त्यांनी खळबळजनक उत्तर दिले. “मी चांगले चित्रपट कधीच नाकारत नाही. परंतु असा एक गट आहे जो काही गैरसमजांमुळे माझ्याविरोधात अफवा पसरवत आहे. मुकेश छाब्रा हे माझ्याकडे आले होते आणि मी दोन दिवसांमध्ये त्यांना गाणी तयार करून दिली,” असे ते म्हणाले. "छाब्रा यांनी मला सांगितले की अनेकांनी त्यांना माझ्याकडे जाऊ नका असे म्हटले. तसेच माझ्याविरोधातही त्यांना निरनिराळ्या गोष्टी सांगितल्या. त्यांच्या गोष्टी ऐकून मला समजले की मला सध्या काम का मिळत नाहीये आणि चांगले चित्रपट माझ्याकडे का येत नाहीयेत" असे रेहमान पुढे म्हणाले.