निर्माता अली अब्बास जफर निर्मित ‘तांडव’ ही वेब सीरिज प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात अडकली. या वेब सीरिची कथा आणि त्यामधील काही दृष्यांवरुन सुरु झालेल्या वादानंतर तांडवच्या संपूर्ण टीमकडून यासंदर्भात माफी मागण्यात आली आहे. दरम्यान अभिनेत्री कंगना रणौतने ट्वीट करत निर्माते अली अब्बास जफर यांना अल्लाहची थट्टा करण्याची हिंमत आहे का? असा संतप्त सवाल केला आहे.

कंगना सतत सोशल मीडियाद्वारे तिचे मत मांडताना दिसते. नुकताच तिने ‘तांडव’ वेब सीरिजवरुन सुरु असलेल्या वादावर वक्तव्य केले आहे. तिने ट्वीटमध्ये थेट सीरिजचे निर्माते अली अब्बास जफर यांना ‘अल्लाहची थट्टा करण्याची हिंमत आहे का?’ असा संतप्त सवाल केला आहे. कंगनाचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

आणखी वाचा : ‘तांडव’च्या निर्मात्यांनी मागितली माफी, म्हणाले…

“माफी मागण्यासाठी वाचणार कुठे? हे तर थेट गळाच चिरतात, जिहादी देश फतवाच काढतात, लिब्ररल मीडिया वर्च्युअल लॉन्चिंग करते, तुम्हाला केवळ मारलंच जात नाही, तर तुमच्या मृत्यूला जस्टिफायही केले जाते. अली अब्बास जफर अल्लाहची थट्टा करण्याची हिंमत आहे का?” या आशयाचे ट्वीट कंगनाने केले आहे.

काय आहे प्रकरण?
‘तांडव’ वेब सीरिजच्या पहिल्याच भागातील एका दृश्यामध्ये मोहम्मद झीशान अयूब नाटकात काम करत आहे. त्याने भगवान शंकराची भूमिका साकारली आहे. दरम्यान तो नाटकामध्ये अपशब्द वापरताना दिसतो. या दृश्यामुळे हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप केला जात होता. तसेच हिंदू देवतांचा अपमान करण्यात आला असल्याचा आरोप काहींनी केले. मुंबईत या वेबसीरीज विरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर उत्तर प्रदेशात अ‍ॅमेझॉन प्राइमच्या भारतातील प्रमुखांसह ‘तांडव’च्या निर्माता-दिग्दर्शक, लेखकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता सीरिजच्या संपूर्ण टीमने माफी मागितली आहे.

हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफरद्वारा निर्मित ‘तांडव’ ही सीरिज ९ भागांची आहे. त्यात सैफ अली खानसोबत डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धुलिया, डीनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अय्यूब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनूप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागराणी हे कलाकार आहेत.