छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये काम करणारा अभिनेता करण मेहरा आणि त्याची पत्नी निशा रावल यांच्यामध्ये सध्या वाद सुरु आहेत. निशाने पोलिसांत तक्रार केल्यानंतर मुंबई पोलिसांनी अभिनेता करण मेहराला अटक केली होती. पण काही वेळाताच करणची जामिनावर सुटका झाली. त्या दोघांनी एकमेंकांवर आरोप केले आहेत. दरम्यान अभिनेत्री कविता कौशिकने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

कविताने निशा रावल आणि करण मेहराला ट्विटरद्वारे अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. तिने कोणाचेही नाव न घेता तुमची भांडणे आणि समस्या कोर्टात सोडवा असे म्हटले आहे. तसेच तिने “फ्रीमध्ये मनोरंजन करु नका” असे ही ट्वीटमध्ये म्हटले आहे. सध्या तिचे हे ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

आणखी वाचा : ‘टप्पू’ आणि ‘जेठालाल’मध्ये झाले भांडण? राज अनादकतनी केला खुलासा

अभिनेता करण आणि निशा रावल गेल्या ९ वर्षांपासून एकत्र आहेत. २०१२ साली त्यांनी लग्नगाठ बांधली. दोघांना एक ४ वर्षांचा मुलगा असून त्याचे नाव काविश असे आहे. निशा रावलने करणवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर त्या दोघांच्या भांडणासाठी करणचे अफेअर कारणीभूत असल्याचा खुलासा तिने केला होता. करणचे विवाहबाह्य संबध असून यामुळे अनेक वर्षांपासून नात्यात तणाव आल्याचे ती म्हणाली होती. तर करणने देखील निशावर अनेक आरोप केले आहेत. निशाने करणच्या कुटुंबीयांना शिवीगाळ केली असून त्यांना धमकावल्यचा आरोप करणने केला. निशाने पोटगीसाठी मोठी रक्कम मागितल्याचा दावा त्याने केलाय.