बॉलिवूडचा ‘परफेक्शनिस्ट’ आमिर खान सध्या त्याच्या आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटानंतर तो एक ड्रीम प्रोजेक्ट हाती घेणार आहे. या ड्रीम प्रोजेक्टचे नाव ‘महाभारत’ असे आहे. हा चित्रपट सहा ते सात भागांत येणार असून ‘सिक्रेट सुपरस्टार’ फेम दिग्दर्शक अद्वैत चंदन याचे दिग्दर्शन करणार आहेत तर आमिर याचा निर्माता असेल. चित्रपट निर्मितीसोबतच आमिर यात अभिनयदेखील करणार असून त्याच्या भूमिकेविषयी निर्णय घेणे अवघड जात आहे.

‘महाभारत’मधील कोणती भूमिका साकारावी याबाबत आमिर संभ्रमात आहे. एकीकडे पटकथालेखकांच्या टीमने तयारी सुरु केली असून दुसरीकडे आमिर मात्र कृष्णाची भूमिका निवडावी की कर्णाची याबाबत द्विधा मनस्थितीत आहे. महाभारतातील त्याचे सर्वात आवडते पात्र कर्ण आहे. मात्र, त्याने कृष्णाची भूमिका साकारावी असे अनेकांचे मत आहे.

वाचा : …म्हणून कंगना पुरस्कार सोहळ्यांमध्ये जात नाही

आता आमिर नेमक्या कोणत्या भूमिकेची निवड करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या ड्रीम प्रोजेक्टसाठी त्याने अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटासही नकार दिलेला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिरने म्हटले होते की, ‘महाभारतावरील हे चित्रपट माझे स्वप्न आहे. पण यासाठी मला माझ्या आयुष्याची १५ ते २० वर्षे द्यावी लागतील.’