प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि पती हर्ष लिंबाचिया यांचं नाव सध्या ड्रग्स प्रकरणी समोर आलं आहे. केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबीने) भारतीच्या घरावर छापा टाकत गांजा जप्त केला. त्यानंतर सोशल मीडियावरील आणि एकंदरीत भारतीच्या प्रतिमेवर मोठा परिणाम झाला असून सोनी टीव्ही तिला ‘द कपिल शर्मा शो’मधून काढून टाकण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, या सगळ्या अफवा असून चॅनेलने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं कृष्णा अभिषेकने सांगितल्याचं ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

“भारतीला कपिल शर्मा शोमधून काढण्यात येणार असल्याच्या केवळ अफवा आहेत. चॅनेलने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. काहीही झालं किंवा कोणतीही परिस्थिती आली तरीदेखील मी आणि कपिल कायम भारतीसोबत आहोत. तसंच जर असं काही झालं तरीदेखील मी भारतीलाच पाठिंबा देईन. तिला कामावर परतावंच लागेल. जे झालं ते झालं. आम्ही भारतीसोबत आहोत”, असं कृष्णा म्हणाला.

आणखी वाचा- ‘द कपिल शर्मा शो’मधून ‘या’ कलाकारांनी घेतली एक्झिट

पुढे तो म्हणतो, “भारतीची तब्येत बरी नसल्यामुळे कदाचित ती २७ नोव्हेंबरच्या शूटमध्ये आली नसावी. तिला स्वत:लाच शूट करायचं नव्हतं. नाही तर ती नक्कीच आली असती. आम्ही एका कुटुंबाप्रमाणेच आहोत”.

आणखी वाचा- भारती सिंहवरुन ट्रोल केल्यामुळे भडकला कपिल, म्हणाला ‘पहिले तुझ्या…’

दरम्यान, भारती व तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. विशेष एनडीपएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर केला. ड्रग पेडलरने दिलेल्या माहितीनंतर भारतीच्या घरावर आणि ऑफिसवर एनसीबीने धाड टाकली होती. त्या धाडीत एनसीबीला ८० ग्रॅमपेक्षा जास्त गांजा मिळाला होता.