अभिनेते जितेंद्र यांची कन्या एकता कपूर हिच्या ‘क’ आद्याक्षराच्या मालिकांनी भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणला. त्यापैकी ‘क्योंकी साँस भी कभी बहू थी’ या मालिकेने तर टेलिव्हिजन क्षेत्रात लोकप्रियतेचे नवे मापदंड निर्माण केले. २००० ते २००८ या आठ वर्षात आठवड्यातील सातही दिवस मालिका चालवत एकताने विक्रमच प्रस्थापित केला होता.

वाचा : अमूलच्या ‘त्या’ जाहिरातीमुळे हृतिकला आले रडू!

२००० साली एकताच्या ‘बालाजी टेलिफिल्म्स’ची निर्मिती असलेली ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ ही मालिका छोट्या पडद्यावर दाखल झाली. त्यानंतर दीर्घकाळ या मालिकेने छोट्या पडद्यावर राज्य गाजवले. शंभर, दोनशे, चारशे करत हजार भाग झाले तरी ही मालिका एकता कपूरला थांबवावीशीच वाटत नव्हती. अनेक वर्षे चाललेल्या या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. ही मालिका संपून आता अनेक वर्षे झाली आहेत. परंतु इतकी वर्षे मालिकेत एकत्र काम करताना त्यामधील कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी यांचे जणू एक कुटुंबच तयार झाले होते. पण, या कुटुंबाच्या एका सदस्याने जगाचा निरोप घेतला आहे.

‘क्योंकी साँस भी कभी बहू थी’ मालिकेचे सहदिग्दर्शन करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक तलत जानी यांचे निधन झाले आहे. ६ ऑक्टोबरला बाथरुममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बाथरूममध्ये पडल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळी तलत जानी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.

वाचा : ‘पद्मावती’च्या ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादाने भारावलेल्या रणवीरने लिहिली भावूक पोस्ट

तलत यांनी आजवर अनेक प्रसिद्ध मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. अभिनेता तुषार कपूरने ट्विट करून तलत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिलंय की, तलत जानी हे केवळ असे एकच व्यक्ती होते, ज्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात बाबा आणि मी दोघांनीही काम केले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.