मनोरंजन विश्वातील कोणत्याही सेलिब्रिटीला एकट्याला जेवढं  प्रेम मिळतं त्याहून जास्तच प्रेम जेव्हा त्या सेलिब्रिटींचे दोनाचे चार हात होतात तेव्हा मिळतं. त्यापैकीच एक प्रसिद्ध टेलिव्हिजन जोडी म्हणजे संदीप बसवाना आणि अश्लेषा सावंत. ‘क्योंकी साँस भी कभी बहू थी’ या मालिकेतील भूमिकांमुळे ही जोडी प्रसिद्धीस आली होती. संदिपने साहिल नावाची व्यक्तिरेखा तर अश्लेषाने गौतमच्या पत्नीची भूमिका साकारली होती. याच मालिकेच्या सेटवर या दोघांची मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. २००२ सालापासून एकत्र असलेले हे प्रेमीयुगुल गेल्या १४ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये आहे.

वाचा : दहावीच्या निकालानंतर रिंकू या क्षेत्राची करणार निवड?

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अश्लेषा म्हणाली की, मी एका छोट्या भागातून आल्यामुळे प्रत्येकजण माझे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी मला संदीपपासून दूर राहण्याचाही सल्ला दिला. तर संदीप म्हणाला की, आम्ही आधी चांगले मित्र होतो. त्यानंतर ती एकदा माझ्या घरी आली आणि त्यानंतर कधीच परत गेली नाही. आम्ही एकमेकांना अजूनपर्यंत कोणतही वचन दिलेलं नाही. आम्ही दोघ एकमेकांसोबत आहोत हेच आमच्यासाठी पुरेसं आहे.

वाचा : पोरगी पास होण्याचं सुख काय असतं ते भाऊ कदमला विचारा

लग्नाविषयी विचारलं असता संदीप म्हणाला की, मी माझ्या आई-वडिलांचा ४० वर्षांचा सुखी संसार पाहिला आहे. पण, त्याचसोबत मी न टिकलेली लग्न आणि खोटी नातीदेखील पाहिली आहेत. अशावेळी दोन व्यक्तींनी एकमेकांसोबत राहण्यात काहीच अर्थ नसतो. त्यामुळे आम्ही दोघ एकमेकांना जोपर्यंत आनंदात ठेवू शकतो तोपर्यंत सोबत राहू असा निर्णय आम्ही दोघांनीही सुरुवातीपासूनच घेतला होता. मी सदैव तुझ्यावर प्रेम करत राहीन अशा आणा-भाका आम्ही दोघांनीही घेतलेल्या नाहीत. जर तिला पुढे जाऊन कधी योग्य जोडीदार मिळाला तर मी तिला अडवणार नाही. मला तिच्यासाठी नेहमीच आनंद होईल.

article-201761635470120821000