नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ चित्रपटाने प्रसिद्धीस आलेली रिंकू राजगुरुने वैयक्तिक आयुष्यात झिंगाट कामगिरी केली आहे. रिंकू राजगुरुने ‘सैराट’मधील अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकीत तर केलेच. पण तिने खऱ्या आयुष्यातही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. अभ्यास आणि काम यांचा समतोल राखत रिंकूने दहावीच्या परीक्षेत ६६ टक्के गुण मिळाल्याचं वृत्त माध्यमांमध्ये फिरते आहे. याला रिंकूच्या कुटुंबियांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

मंगळवारी दुपारी १ वाजता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. पण, त्याआधीच रिंकूचा निकाल माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. गेल्यावर्षी रिंकूला नववीत ८१.६० टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर दहावीत गेलेल्या रिंकूने शाळेत न जाता घरीच अभ्यास करण्याचा निर्णय घेतला होता. त्यातही ती ‘मनसु मल्लिगे’ या कन्नड चित्रपटासाठी चित्रीकरण करत होती. त्यामुळे काम आणि अभ्यास यांच्यामध्ये समतोल राखण्याचे आव्हान तिच्यासमोर होते.

राज्याचा एकूण निकाल ८८.७४ टक्के इतका लागला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल ०.८२ टक्क्यांनी कमी लागला आहे. कोकण विभागाने ९६.१८ टक्क्यांसह निकालात बाजी मारली आहे. यंदाही मुलींनीच अव्वल स्थान पटकावले आहे. ९१. ४६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ८६.५१ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. २४ तारखेला दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणार आहे.