‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर 'जिवलगा' ही मालिका नुकतीच सुरू झाली. पण अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, मधुरा देशपांडे अशी तगडी स्टारकास्ट या मालिकेत आहे. सध्या ‘जिवलगा’ मालिका निर्णायक वळणावर येऊन पोहोचलीय. काव्या आणि निखिलच्या प्रेमप्रकरणाबद्दल विधीला वाटणारा संशय अखेर खरा ठरलाय. विधीसाठी ही गोष्ट नक्कीच धक्कादायक आहे. सुखी संसाराला दृष्ट लागावी अशीच काहीशी घटना विधीच्या आयुष्यात घडलीय. या कठीण प्रसंगात विधी काय निर्णय घेणार याची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. विधीप्रमाणेच काहीशी अवस्था विश्वासची आहे. काव्या आणि निखिलच्या नात्याविषयी त्याला कल्पना असली तरी आता त्याने याविरोधात ठोस पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय. काव्या आणि निखिलला त्यांच्या चुकीची जाणीव करुन देण्यासाठी विश्वास आणि काव्या काय निर्णय घेतात याची उत्कंठावर्धक गोष्ट ‘जिवलगा’ या मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळणार आहे. ‘जिवलगा’मध्ये नातेसंबंधांचे अनेक पैलू उलगडत गेलेले प्रेक्षकांना पाहायला मिळतील. मानवी स्वभाव आणि त्यात दाखविलेली प्रगल्भता व विचार करण्याची पद्धत यांची एक वेगळी शैली या कथेतून पुढे येत आहे. बऱ्याचदा आपली नाती समजून घेण्याची आणि त्यांचे मूल्यमापन करण्याची पद्धत चुकते. आपल्या अवतीभवती असलेल्या माणसांबद्दलचे आपले अंदाज चुकतात. याचा गोष्टींवर ही कथा प्रकाश टाकते. प्रेमामध्ये काय ताकद असते, हेसुद्धा या कथेतून अधोरेखित होते. त्यामुळे ही कथा प्रत्येक घरातील प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे.