अरबाज खानशी घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोराला सोशल मीडियावर येणाऱ्या नकारात्मक प्रतिक्रियांना सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी घटस्फोटानंतर मलायकाने पोटगी म्हणून अरबाजकडून १५ कोटी रुपये घेतल्याच्या चर्चा रंगत होत्या. या बातमीमुळे तिने कोणताही फोटो सोशल मीडियावर शेअर करताच मलायकाला तिच्या घटस्फोटाशी निगडीत प्रश्नांचा सामना करावा लागतो.

फील गुड फॅब्रिक नावाच्या इन्स्टाग्राम युझरने मलायकाच्या एका फोटोवर कमेंट करताना लिहिले की, ‘आजकालच्या स्त्रीया अशाच करतात. श्रीमंत मुलांना जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्न करतात. मग घटस्फोट घेऊन त्यांच्याकडून पोटगी घेतात. त्यांनी दिलेल्या पोटगीवर नंतरच आयुष्य आरामात घालवतात.’

VIDEO: सर्व सामान्य पती- पत्नीसारखेच भांडतात ऐश्वर्या आणि अभिषेक

तो युझर एवढंच बोलून थांबला नाही तर, ‘तू स्वतः कमवत असून तुला पोटगीची गरज काय? असा प्रश्न तिला विचारला. ‘मी कोणत्याही लिंगाचा मान ठेवण्यापेक्षा माणसांचा मान ठेवतो. आता मलायकाचे आयुष्य फक्त तोकडे कपडे घालण्यात, जिम आणि सलॉनमध्ये जाण्यात आणि सुट्टयांवर फिरायला जाण्यातच जाते. तुझ्याकडे काही काम नाहीये का, की फक्त नवऱ्याने दिलेल्या पोटगीवरच जगत आहेस,?’ असा प्रश्न तिला विचारण्यात आला.

 

 

यानंतर मलायकाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्या युझरला सडेतोड उत्तर दिले. ४३ वर्षीय या अभिनेत्रीने लिहिले की, ‘अशा प्रकारच्या संभाषणात मला स्वतःला सहभागी करुन घ्यायचं नाहीये. हे माझ्या प्रतिष्ठेच्या विरोधात आहे. माझ्याबद्दल काहीही माहित नसताना तू मला कमी लेखण्याचा प्रयत्न करतोयस, म्हणून मला आज बोलावं लागतंय. दुसऱ्यांच्या आयुष्याला कमी लेखण्याशिवाय तुला काहीही येत नाही. मला खरंच असं वाटतं की तू तुझ्या मोकळ्या वेळेत खरंच काही तरी केलं पाहिजेस. तू तुझ्या आयुष्यात फार काही चांगलं करतोयस हे यावरून तरी दिसत नाहीये.’

मलायका आणि अरबाजची पहिली भेट एका जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. १९९८ मध्ये दोघांनी लग्न केले. मलायका अनेक सिनेमांच्या गाण्यात आयटम साँग करताना दिसते. सलमान खान आणि अरबाज खान स्टारर ‘दबंग’ सिनेमात ‘मुन्नी बदनाम’ गाण्यावर मलायका थिरकली होती. गेल्या वर्षी या जोडप्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता जो कौटुंबिक न्यायालयाने आता मान्यही केला आहे.