अंबिका+रसिका निर्मित आणि साईसाक्षी प्रकाशित ‘ढाई अक्षर प्रेम के’ हे नाटक २३ डिसेंबर २०१७पासून रंगभूमीवर येत आहे. निर्माती सुजाता मराठे आणि मुक्ता बर्वे यांच्या या नाटकाचा मुहूर्त ९ नोव्हेंबर रोजी करण्यात आला. व. पु. काळे यांच्या ‘तु भ्रमत आहासी वाया’ या कादंबरीवर आधारित ‘ढाई अक्षर प्रेम के’ हे नाटक आहे.
निर्माती मुक्ता बर्वे यांची छापा काटा, रंग नवा, लव्हबर्ड्स, कोडमंत्र या नाटकानंतरची ही पाचवी नाट्यनिर्मिती असणार आहे. मुक्ता बर्वेच्याच ‘दीपस्तंभ’, ‘CODE मंत्र’ या नाटकातून अभिनय करणाऱ्या सुजाता मराठे या नाटकाद्वारे प्रथमच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. वपुंच्या ‘तु भ्रमत आहासी वाया’ या कादंबरीचं नाट्यरुपांतर आणि नाट्य दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. पुण्यात अनेक हौशी व प्रायोगिक नाटकं करणारे दिग्पाल लांजेकर या नाटकाव्दारे व्यावसायिक नाट्यसृष्टीत प्रवेश करत आहेत.
वाचा : ..म्हणून अर्जुन रामपालला भरावा लागला २०० रुपये दंड
‘CODE मंत्र’ या नाटकात कर्नल निंबाळकरांची भूमिका करणारे अभिनेता अजय पुरकर ‘ढाई अक्षर प्रेम के’ नाटकात प्रमुख भूमिकेत आहेत. ‘रुद्रम’ मालिकेत छोटीशी भूमिका साकारणारी तरीही लक्षात राहिलेली अभिनेत्री किरण खोजे या नाटकात अजय पुरकर सोबत प्रमुख भूमिकेत दिसेल. या दोघांशिवाय ‘ढाई अक्षर प्रेम के’ मध्ये सचिन देशपांडे, अतुल महाजन, तेजस कुलकर्णी, नितीश घारे, अश्विनी कुलकर्णी यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.
आजकालच्या धावपळीच्या जगात माणसावरील तणाव वाढत आहे. या ताणतणावांचा परिणाम वैयक्तिक नातेसंबंधांवर होताना दिसतो. वैयक्तिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना एकटेपणा पसंत करणारा माणूस हा स्वतंत्र होतो आहे की एकटा पडतो आहे? हा मानसशास्त्रीय प्रश्न मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. ज्येष्ठ साहित्यिक व.पु.काळे यांनी त्यांच्या ‘तू भ्रमत आहासी वाया’ या कादंबरीत या प्रश्नांचा काळाच्या पुढे जाऊन विचार केला आहे. या प्रश्नाचं चिंतन करताना या सगळ्या प्रश्नांचं उत्तर माणसाने स्वतःच्या गरजा नेमक्या किती आणि कोणत्या आहेत त्या ओळखणं आणि स्वतःला आणि नातेसंबंधांना जास्तीत जास्त ‘डोळस’ वेळ देणं ही माणसाच्या सुखी आणि आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली ठरू शकते असा विचार व.पु.काळे मांडतात.
Tiger Zinda Hai Review वाचा : टायगरचा ठसा!
आपल्याकडे नसलेल्या गोष्टींच्या मागे धावण्यापेक्षा असलेल्या गोष्टींचा आनंद घेणे यातूनच सुख सापडू शकते. मोठ्या अर्थाने प्रेम आणि त्यापुढे जाऊन भक्ती हे माणसाच्या जीवनाचे साध्य आहे हा या कादंबरीत सहजपणे आलेला विचार अत्यंत खुसखुशीत आणि खुमासदार पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न ‘ढाई अक्षर प्रेम के’ या नाटकात करण्यात आला आहे. जीवन विषयक तत्वज्ञान असले तरी छोट्या छोट्या ऊदाहरणांतून आणि मनोरंजक संवादातून हे नाटक आपल्याला विचार करायला लावणारे आहे.