बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण बॉलिवूड वर्तुळात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पुरी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. मोदींशिवाय महेश भट्ट, बोमन इरानी, अक्षय कुमार, करण जोहर, प्रिती झिंटा, नेहा धुपिया आणि सिनेसृष्टीतील इतर कलाकारांनीही ओम पुरी यांना सोशल साइट्सवरुन श्रद्धांजली वाहिली.

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि ओम पुरी यांचे फार जुने संबंध होते. शबाना आझमी यांनी ओम पुरी यांच्यासोबत तब्बल १४ सिनेमांत काम केले होते. त्यामुळे ओम यांच्या निधनाचे अतीव दुःख शबाना यांना झाले आहे.
अनेक सिनेमांतून एकत्र काम केलेल्या या जोडीने काही अविस्मरणीय सिनेमेही प्रेक्षकांना दिले आहेत. ओम पुरी आणि शबाना आझमी यांनी मृत्युदंड (१९९७), मुहाफिझ (१९९४), धारावी (१९९३), अंतरनाद (१९९२), दिशा (१९९१), पार (१९८५), स्पर्ष (१९८४), मंदी (१९८३), अर्ल्ब्ट पिंटो को गुस्सा क्यो आता है (१९८१).

त्यांच्या सिनेमांची यादी इथेच संपत नाही. त्यांनी अनेक हॉलिवूड सिनेमातही एकत्र काम केले आहे. सिटी ऑफ जॉय (१९९२), कस्टडी (१९९४), रिलक्टंट फण्डामेन्टलीस्ट (२०१३). या सिनेमांमध्ये या जोडीने एकत्र काम केले होते.

शबाना यांनी ट्विटरवरुन त्यांच्या भावना व्यक्त करत म्हटले की, ‘ओम पुरी तु इतक्या लवकर आम्हा सर्वांना सोडून गेलास. मला माफ कर. आपले भांडण, आपले हसणे हे सगळे मला आता आठवत आहे.’

om-puri-shabana-azmi-1

छाया सौजन्यः इंडियन एक्सप्रेसom-puri-shabana-azmi-2छाया सौजन्यः इंडियन एक्सप्रेस

THE RELUCTANT FUNDAMENTALIST, from left: Om Puri, Shabana Azmi, 2012./©IFC Films

 

छाया सौजन्यः इंडियन एक्सप्रेस

शबाना यांनी ओम पुरी यांच्या अंत्यविधीचीही माहिती दिली. ‘कुपर रुग्णालयात त्यांचे पार्थिव, शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे. तिथून त्यांचे पार्थिव दुपारी ३ वाजता निवासस्थानी आणण्यात येईल. त्यानंतर ओशिवरा येथे संध्याकाळी ६ च्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.’ असे ट्विट आझमी यांनी केले.

आपल्या हुकमी अभियनाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते ६६ वर्षांचे होते. त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९५० रोजी हरियाणातील अंबाला येथे झाला होता.

‘घाशीराम कोतवाल’ सिनेमाद्वारे त्यांनी अभिनयक्षेत्रात पर्दापण केले होते. ‘आक्रोश’ हा ओम पुरी यांचा पहिला गाजलेला सिनेमा होता. केंद्र सरकारने त्यांच्या सिनेसृष्टीतील योगदानाची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्कारने सन्मानित केले होते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या १९७३ बॅचचे ते विद्यार्थी होते. अभिनयाबरोबरच त्यांचा भारदस्त आवाज आणि संवादकौशल्य अप्रतिम होते. ‘अर्धसत्य’ सिनेमातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. ओम पुरी यांनी हॉलिवूडमध्येही आपली छाप सोडली होती. अनेक इंग्रजी सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला.