संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती सिनेमाचा वाद अजूनही सुरूच आहे. या वादावर आता अनेकांनी आपली मतं मांडली आहेत. आतापर्यंत या सगळ्या वादातून दूर असलेल्या सलमान खानने ही आता या वादावर भाष्य केले आहे. दिल्लीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान सलमान म्हणाला की, ‘सिनेमावर वाद घालण्याने कोणाचाही फायदा न होता नुकसानच होणार. सध्या सुरू असलेल्या वादात कोण चूक आणि कोण बरोबर याचा निर्णय लावणं कठीण आहे. सिनेमा प्रदर्शनामध्ये उशीर होईल आणि प्रेक्षकही थिएटरमध्ये जाण्यास घाबरतील. एवढेच काय तर चित्रपटगृहांचे मालकही हा सिनेमा त्यांच्या चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यास घाबरतील. यामुळे चित्रपटगृहांच्या बाहरे प्रदर्शनं होऊ शकतात.’

‘सिनेमा पाहण्याआधी त्यावर टिपणी करणं आणि लोकांच्या भावना दुखावणं योग्य होणार नाही. अशा वादांत अनेक वेगळे मुद्दे समोर येतात. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड आणि सर्वोच्च न्यायलयाने योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे. सेन्सॉर बोर्ड जो निर्णय घेईल त्याचा आपण सन्मानच करु.’ ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या एका कार्यक्रमात सलमान खानने आपले विचार मांडले.

पद्मावती सिनेमात राजपूत राणी पद्मावतीची हिंमत आणि साहस यांची कथा सांगण्यात आली आहे. सिनेमाच्या चित्रीकरणापासूनच हा एक वादाचा विषय झाला होता. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भन्साळी यांचा राजपूत संघटना करणी सेनाने विरोध केला होता. जयपुर येथे सेनेच्या कार्यकर्त्यांनी भन्साळी यांना मारहाणही केली होती. त्यांच्यामते पद्मावती आणि अलाउद्दी खिल्जी यांच्या व्यक्तिरेखेमध्ये प्रेमदृश्य दाखवण्यात आले आहेत. पण प्रत्यक्षात मात्र तसे काहीच झालेले नाही. हा सिनेमा प्रदर्शित झाला तर चित्रपटगृह जाळण्याचीही त्यांनी धमकी दिली होती. भाजपचे नेता भन्साळी आणि दीपिकाचा शिरच्छेद करणाऱ्यांना १० कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते.